यवतमाळ : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन विहीरी अद्यापही अपूर्ण आहेत. या विहीरी मुदतीत पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना या विहीरींना मुकावे लागतील. त्यामुळे शासनाने या अपूर्ण विहीरी पूर्ण करण्यास मुदतवाढ दिली असली तरी जिल्ह्यातील अशा विहीरी मात्र येत्या मार्च अखेरपर्यंतच पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन, विहीर व पाणी टंचाईचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, आमदार मदन येरावार, आमदार संदिप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ.अशोक ऊईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार राजु तोडसाम, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात मग्रारोहयो व धडक सिंचन विहीर कार्यक्रमाअंतर्गत मंजूर विहीरी, पूर्ण झालेल्या विहीरी आणि अपूर्ण विहीरींचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात एक हजार ९३५ विहीरी अपूर्ण असून शासनाने या विहीरी पूर्ण करण्यास मुदतवाढ दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)
अपूर्ण सिंचन विहिरी मार्गी लावा
By admin | Updated: January 10, 2015 02:05 IST