अपघाताची भीती : महागाव तालुक्यातील वाहनधारक व नागरिक त्रस्त ओंकार नरवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर मोठ्ठाले खड्डे पडले असून पावसाळ्याला सुरुवात झाली तरी रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्याचा बांधकाम विभागाला विसर पडला आहे. महागाव तालुक्यातून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महागाव-कलगाव-पुसद मार्गावर तर मोठमोठाले खड्डे दिसून येतात. पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांची डागडुजी करण्यात येईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु आता पावसाळा सुरू झाला तरी बांधकाम विभागाने डागडुजीचे काम हाती घेतले नाही. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्यानंतर वाहनधारकांना खड्डे दिसत नाही. परिणामी वाहन उसळून अपघात होण्याची शक्यता असते. गतवर्षी पावसाळ्यात अनेक दुचाकीस्वार अशा खड्ड्यांमुळे पडून जखमी झालेत. बांधकाम विभागाने या रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांकडे बांधकामचे दुर्लक्ष
By admin | Updated: June 1, 2017 00:22 IST