आरोग्य धोक्यात : साडेतीन हजार रुग्णांचा प्रश्न यवतमाळ : एचआयव्ही, एड्ससह जगणाऱ्यांना औषधीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. शासकीय रुग्णालयातून औषधींचा पुरवठा होत नसल्याने नोंदणीकृत साडेतीन हजार रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एचआयव्ही - एड्स उपचार केंद्रात (एआरटी) जिल्ह्यातील तीन हजार ५०० रुग्ण ‘लाईन वन’चा उपचार घेत आहेत. आता औषधीत सुधारणा झाल्यानंतर एकच गोळी नियमित घ्यावी लागते. या औषधीचा नॅको (नॅशनल एड्स कंटोल आॅर्गनायझेशन) कडून पुरवठा केला जातो. टीएलई (टीनोफोव्हीट लॅमी व्होडींग इफा व्हिरेंस) या गोळीत तिन्ही घटक आहेत. मात्र महिनाभरापासून या गोळीचा पुरवठा बंद असल्याने एचआयव्ही बाधीतांची परवड होत आहे. बाहेर ही औषधी अतिशय महाग आहे. महिन्याकाठी दोन हजार रुपयांचे औषध घ्यावे लागते. व्यक्तीचा सीडीफोर ( पांढऱ्या पेशी) कमी झाल्यानंतर त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. हळुहळु एचआयव्हीचा व्हायरस वाढत जातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे टीएलई गोळ््या नियमित घेणे आवश्यक आहे. मात्र मागील काही महिन्यापासून या औषधाचा मागणी इतका पुरवठा होत नाही. त्यामुळे औषधासाठी आलेल्या रुग्णाला परत जावे लागते. (कार्यालय प्रतिनिधी)
एचआयव्हीग्रस्तांची औषधीसाठी पायपीट
By admin | Updated: May 5, 2016 02:34 IST