यवतमाळ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या मदत वाटपाचे निकष जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत तर बहुभूधारक शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे. विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी ६ जानेवारी रोजी मदत वाटपासंबंधीचे निकष व मार्गदर्शकतत्वे जाहीर केली. या संबंधीचे आदेश यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. गतवर्षीच्या खरीप हंगामात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी निघाल्याने सर्वत्र टंचाई सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा विधीमंडळ अधिवेशनात केली गेली होती. त्यासंबंधीचा आदेश लवकरच काढला जाणार आहे. मदतीचे निकष मात्र ठरविण्यात आले आहे. त्याच्या याद्या तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत नुकसानभरपाई तथा मदत वाटप केली जाणार आहे. बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी मदत वाटपाची मर्यादा एक हेक्टर एवढी निश्चित केली आहे. फळबागांना प्रती हेक्टरी १२ हजार रुपये, बागायती शेतीच्या नुकसानापोटी हेक्टरी नऊ हजार रुपये तर जिरायती शेतीला प्रती हेक्टर साडेचार हजार रुपये मदत दिली जाणार आहे. शेतकरीनिहाय मदत वाटपाची रक्कम निश्चित करण्याचे निर्देश दिले गेले आहे. मदत वाटताना फळबागांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर बागायती व नंतर जिरायती असा शेतकऱ्यांचा क्रम राहील. गारपीट व अतिवृष्टीग्रस्त बहुभूधारक शेतकऱ्यांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्याचे निर्देशही दिले गेले आहे. या शेतकऱ्यांच्या याद्या ८ जानेवारीला आयुक्तांकडे सादर केल्या गेल्या. गावनिहाय, बँक निहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविण्यात आली असून कृषी सहायक, ग्रामसेवक त्यांच्या मदतीला राहणार आहे. या याद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी यांच्यातील एकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याच अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसनही जागीच करावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत मदत
By admin | Updated: January 10, 2015 02:04 IST