लिंक फेल : कागदपत्रे मिळण्यास होतोय विलंब, विद्यार्थी-पालक त्रस्तवणी : येथील तहसील कार्यालयाजवळील सेतू केंद्रामध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी गुरूवारी विद्यार्थ्यांसह पालकांची अलोट गर्दी दिसून येत होती. बुधवारपासून सेतूमधील लिंक फेल झाल्यामुळे अनेक कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. सध्या सर्वत्र प्रवेशाची लगबग सुरू आहे. दहावी, बारावीच्या निकालानंतर अनेक शाळा, महाविद्यालयांंमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्याना सेतू केंद्रातून काढावे लागतात. विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रांची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी गुरूवारी सेतू केंद्राजवळ जत्रेचे स्वरूपच आले होते. विद्यार्थी व पालक तासन् तास घामाघूम होऊन कागदपत्रे मिळविण्यासाठी रांगेत उभे होते. सेतू केंद्रातील तिनही खिडक्यांवर प्रमाणपत्रासाठी लांबच लांब रांग लागली होती.काही पालकांनी १५ दिवसांपूर्वीच विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहे. त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी तारीखही देण्यात आली होती. मात्र बुधवारपासून लिंक फेल झाल्याचे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले. लिंक फेल असल्यामुळे कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. त्यातच दररोज सेतूमध्ये प्रमाणपत्रांसाठी गर्दी वाढत असल्याने सेतूमधील कर्मचाऱ्यांवर प्रमाणपत्रांचा बोझा वाढतच चालला आहे. एका विद्यार्थ्याचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कमीत कमी १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यात जर लिंक फेल झाली, तर विद्यार्थ्यांना लिंक येईपर्यंत तासन् तास रांगेतच उभे राहावे लागते. सेतूमधील सर्व सुविधा आता आॅनलाईन होऊनही पालक व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.काही पालकांनी रांगेत उभे न राहता खासगी महा-ई-सेवा केंद्राकडे प्रमाणपत्र काढण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र शहरातील खासगी सेतू केंद्रही आता गर्दीने गजबजून दिसून येत आहे. प्रवेशाची अंतिम तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी सेतू केंद्रामधील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया उद्या १९ जूनपर्यंत चालणार आहे. त्यानंतर येणारे अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याने पालकांनी गुरूवारी प्रमाणपत्रासाठी धावाधाव सुरू केली होती. २० जूनपासून मेरीट लिस्ट लागणार असल्याने विद्यार्थ्यांना १९ जून्पर्यंत आॅनलाईन फॉर्म भरणे बंधनकारक आहे. त्यासाठी सेतूमधील कागदपत्रांची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र सेतू केंद्रातील लिंक फेलमुळे विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहे. त्यांना आता प्रवेश घेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. सेतूमधून कागदपत्रे काढण्यासाठी सध्या विद्यार्थी व पालकांनी गर्दी केल्यामुळे तहसील परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तहसील परिसरात शेकडो वाहनांच्या रांगाच रांगा उभ्या राहात आहे. त्यामुळे तेथे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो, पार्किंगची सुविधा नसल्याने पालक, विद्यार्थ्यांना रस्त्यावरच वाहने उभी ठेवावी लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)प्रमाणपत्रांसाठी लागतात १५ दिवसयेथील खासगी व तहसीलमधील सेतू केंद्रात प्रमाणपत्रांसाठी अर्ज केल्यानंतर ते प्रमाणपत्र १५ दिवसांच्या नंतर मिळण्याची तारीख देण्यात येते. आता प्रवेश प्रक्रिया जवळ येत असल्याने १५ दिवसानंतर प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा फायदा तरी काय, असा प्रश्न पालक व विद्यार्थी सेतू चालकांना विचारत आहेतहसील परिसरात पिण्याच्या पाण्याचा अभाव येथील तहसील परिसरात दररोज विविध कामानिमित्त विद्यार्थी व पालक येत असतात. मात्र त्यांना तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. सेतूमध्ये कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांना उभे राहावे लागते. उभे राहून-राहून विद्यार्थी थकून जातात. त्यांना तहान लागल्यानंतर तेथे पाण्याची व्यवस्था नसल्याने रांगेतून बाहेर निघून पाण्याच्या शोधात विद्यार्थ्यांना भटकावे लागते.
सेतूमध्ये उसळली अलोट गर्दी
By admin | Updated: June 19, 2015 02:08 IST