लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी सकाळी तासभर जोरदार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. पालिकेने योग्यप्रकारे नाला सफाई केलेली नसल्याने मुसळधार पावसाने नाल्या तुंबल्या आणि पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले. तलावफैल, अंबिकानगर, वीटभट्टी परिसरासह अनेक भागातील रहिवाशांचे यामुळे हाल झाले. दरम्यान, जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू असून शुक्रवारपर्यंत सरासरीच्या ९९.५ टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहरातील चमेडियानगर, पॉवर हाऊस परिसर, भारतनगर, अंबिकानगर, सुराणा ले-आऊट, उमरसरा, रेल्वेलाईन परिसर, वीटभट्टी परिसर या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तलावफैल परिसरात मूर्ती निर्मितीचे काम सुरू आहे. या कारागिरांनाही या पावसाचा फटका बसला. काही कारखान्यात पाणी शिरल्याने मूर्तींचेही नुकसान झाले. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९९.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी यवतमाळ शहरासह वणी, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी परिसरात जोरदार पाऊस झाला. घाटंजी तालुक्यात १९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.