१५ गावांचा प्रश्न : डोंगरखर्डा येथे पाणी व लाईटचीही योग्य सोय नाहीनिश्चल गौर डोंगरखर्डानागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले आरोग्य पथकच आजारी आहे. औषध आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. गेली काही महिन्यांपासून निर्माण झालेला हा प्रश्न सोडविण्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कळंब तालुक्यात येत असलेल्या येथील आरोग्य केंद्राला परिसरातील जवळपास १५ गावे जोडण्यात आलेली आहे. सुमारे ३० हजार नागरिकांना आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सुविधा सुरुवातीला उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कालांतराने त्यामध्ये प्रचंड शिथिलता आली. दर्जेदार सेवा तर दूर आवश्यक तो औषधी साठाही याठिकाणी उपलब्ध नाही. शिवाय पाणी आणि विजेचा प्रश्नही याठिकाणी आहे. कामचलावू सेवा याठिकाणी दिली जात आहे. डोंगरखर्डा गावाला अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या पाण्यात मेडिक्लोअर टाकल्यास बऱ्याचअंशी शुद्ध पाणी उपलब्ध होते. मात्र ते आरोग्य पथकात उपलब्ध नाही. ओआरएसचासुद्धा तुटवडा आहे. मलेरिया वर्कर्सचे पद अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने ब्लिचिंग पावडर, पाणी नमुने घेतले जात नाही. या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रकृती आणखी बिघडू नये म्हणून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. गरीब कुटुंबांना मात्र हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.लाखो रुपये खर्च करून आरोग्य पथकाची इमारत उभी करण्यात आली. आता मात्र दुरुस्तीवर २३ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. २१ लाख रुपये खर्च करून धर्मशाळा बांधण्यात येत आहे. एकीकडे आरोग्य पथकात नागरिकांना योग्य सोयी उपलब्ध करून दिल्या जात नाही. मात्र दुसरीकडे अवास्तव खर्च केला जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा द्यावा, ही नागरिकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु शासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या ठिकाणी दिसून येत आहे. येथे कर्मचाऱ्यांना निवासाची सोय उपलब्ध आहे. पण पथकात पाणी व लाईटची समस्या आहे. या समस्या दूर करून रिक्त असलेली पदे तत्काळ भरावी, अशी मागणी होत आहे.
आरोग्य पथक आजारी
By admin | Updated: May 7, 2016 02:34 IST