पावसाळ्यात संकट : कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, ग्रामीण रूग्णालयच आजारीमारेगाव : गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य सेवेची वाट लागली आहे. कर्मचाऱ्यांची काम टाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. केवळ कागदोपत्री आरोग्य योजना राबविल्या जात असल्याचे अहवाल वरिष्ठांना पाठविले जातात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत आरोग्य यंत्रणेबाबत प्रचंड रोष दिसून येत आहे.सध्या तालुक्यात सर्वात ढेपाळलेला विभाग जर कोणता असेल, तर आरोग्य विभाग आहे. या विभागाचे कर्मचारी अक्षरश: जनतेच्या जिवाशी खेळत आहे. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीवच दिसून येत नाही. या विभागात प्रत्येक कर्मचाऱ्यांत कामचुकारपणा करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्याची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे. पावसाळ्यात ग्रामीण आरोग्य बिघडते. साथीचे आजार फोफावतात. मात्र तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात जाऊन जनतेला मार्गदर्शन करते, असे चित्र कधीही पाहायला मिळत नाही. परिचारिका कधी गावात जात नाही. गावांना भेटीही देत नाही. बहुतांश परिचारिका मुख्यालयी राहणे तर सोडाच, त्या इतर तालुक्यातून अप-डाऊन करतात. कोण काय करते, कोणाचा थांगपत्ता कुणाला नाही. तालुक्यात मार्डी, वेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. नवरगाव येथे आयुर्वेदीक रूग्णालय, म्हैसदोडका व पेंढरी येथे फिरते रूग्णालय आहे. इतर ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. प्रत्येक गावासाठी आरोग्य सेविका आहे. मात्र या कर्मचाऱ्यांचा लाभ जनतेला होताना दिसत नाही. अनेक परीचारिका तर गावात जातच नाही. अंगणवाडी सेविकेशी भ्रमणध्वनीवरून माहिती घेऊन कागदी घोडे नाचवितात. केवळ टीएचओनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित राहणे, एवढाच त्यांचा उपक्रम सुरू आहे. तालुका आरोग्य अधिकारी अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची हिंमत वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अप-डाऊनचा आजार जडला आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यवतमाळ येथून अप-डाऊन करतात. रात्री कुणी आजारी पडले, तर डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यातून अनुचित घटना घडतात. साध्या-साध्या औषधांचा तुटवडा, ही तर नित्याचीच बाब झाली आहे. तालुका आरोग्य विभागाच्या कारभाराची ही अवस्था असताना येथील ग्रामीण रूग्णालयाचीही वाट लागली आहे. नुकतीच कुंभा-टाकळी येथे वीज कोसळली. रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र साध्या सलाईन लावायलासुद्धा तेथे औषधी नव्हत्या. रूग्ण व नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला, तर डॉक्टरच रूग्णांच्या नातेवाईकांशी हमरी-तुमरीवर उतरले. नागरिकांनी आमदारांच्या कानावर ही गोष्ट घातली. आमदारांनी रूग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे कळते. (शहर प्रतिनिधी)दवाखान्यावर वचक कोणाचा ?येथील ग्रामीण रूग्णालयावर वचक कोणाचा, हा गहन विषय आहे. नुकताच १८ जूनला एका आॅटोचा अपघात घडला. नऊ ते १० प्रवासी जखमी झाले. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांसोबत बघ्यांची गर्दी झाली. तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सफाई कर्मचाऱ्यांची धावपळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. रूग्णालयात आलेल्या नागरिकांना आणि स्थानिक पत्रकारांना त्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांसमोर ज्या भाषेत हाकलून लावले, त्यावरून ग्रामीण रूग्णालयावर वचक कुणाचा, असा प्रश्न उपस्थितांना पडला.उपकेंद्रातील औषधी जाते कुठे ?प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अनेक आजारांवरील औषधे रूग्णांना मोफत देण्यासाठी येतात. मात्र गाव पातळीवर जायला कुणीच तयार नसल्याने आणि ही औषधी अशीच पडून राहत असल्याने सर्वसहमतीने ही औषधे खुल्या बाजारात विकली जात असल्याची कुजबुज सुरू आहे. ग्रामीण जनताही या आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्रात जाण्याऐवजी उपस्थित खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. परिणामी केंद्रातील औषधी तशीच पडून राहाते. त्याचा विनियोग आरोग्य कर्मचारी परस्पर करून टाकतात.
आरोग्य सेवा कोलमडली
By admin | Updated: June 21, 2015 00:08 IST