उमरखेड : डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी दिसत आहे. बहुतांश कर्मचारी शहराच्या ठिकाणी मुक्कामी राहून कारभार पाहताना दिसत आहे. परिणामी विकास कामांचा खोळंबा होत असून नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या शोधात शहर पालथे घालावे लागते. उमरखेड तालुका हा डोंगरदऱ्या आणि जंगलांमध्ये वसलेला आहे. अनेक गावे दुर्गम आहे. याठिकाणी असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येते. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आदींची प्रत्येक गावात नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे करीत कर्मचारी उमरखेड अथवा शहराच्या गावी परिवारासह राहतात. आरोग्य सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचाऱ्यांचेही मनोबल वाढत आहे. अभयारण्यात अनेक गावात शासनाने आरोग्य केंद्र निर्माण केले आहे. मात्र कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गंभीर रुग्णाला घेऊन उमरखेड गाठावे लागते. रस्त्याच्या दुरवस्थेने अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होतो. परिणामी रुग्ण रस्त्यातच गतप्राण होतो. मात्र या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नाही. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षकही जाणे येणे करताना दिसून येतात. उशिरा जाणे आणि लवकर निघणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. अनेकदा तर दुर्गम गावात शिक्षक पोहोचतही नाही. त्यादिवशी विद्यार्थी सुटीचा आनंद घेतात. लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यास कोणताही उपयोग होत नाही. तलाठी हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कर्मचारी आहे. मात्र तलाठ्यांचे दर्शन गावकऱ्यांना दुर्लभ होते. प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांची गरज असते तेव्हा गावकरी उमरखेड शहरात तलाठ्यांचा शोध घेतात. विद्यार्थ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. ग्राम विकासातील दुवा असलेल्या ग्रामसेवकाचेही असेच आहे. ग्रामसेवक केवळ बैठकीला उपस्थित राहतो. त्यानंतर मात्र त्यांचे दर्शनही होत नाही. वनकर्मचारीही आपल्या कामात कुचराई करताना दिसून येतात. गस्तीअभावी जंगलातील सागवान तस्कर दिवसाढवळ्या तोडून नेत आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे शहरात राहून कारभार पाहतात. अनेक कर्मचारी तर मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून घरभाडेही घेतात. या सर्व प्रकारामुळे विकास कामांचा मात्र खोळंबा होत आहे. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी
By admin | Updated: May 30, 2015 02:36 IST