घाटंजी : शेतकर्यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्यांकडून घेतला जात आहे. यावर व्यापारी धार्जीण्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कुठलेही नियंत्रण नाही. परिणामी दिवसेंदिवस शेतकरी नाडवला जात आहे. सध्या खरिपाची लगबग सुरू आहे. शेतकर्यांना पैशाची गरज आहे. याच बाबींचा गैरफायदा व्यापार्यांकडून घेतला जात आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर १५ ते २0 दिवसांपासून ६0 ते ७0 शेतकर्यांनी हरभरा विकायला आणला आहे. जवळपास एक हजार २00 ते एक हजार ५00 क्विंटल हरभरा याठिकाणी पडून आहे. हा शेतमाल खरेदी करावा, यासाठी शेतकरी बाजार समितीकडे अर्ज, विनंत्या करत आहे. एकीकडे शेतकर्यांचा माल खरेदीस टाळाटाळ केली जात आहे तर दुसरीकडे व्यापार्यांचा माल मात्र खरेदी होत आहे. व्यापारी शेतकर्यांकडून कमी दरात खरेदी करतात. हाच माल व्यापारी शेतकर्यांच्या सातबारावर जादा दराने विकतात. एकीकडे शेतकर्यांच्या मालाला भाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे व्यापार्यांचा माल जादा दराने खरेदी करायचा हे धोरण बाजार समितीने अवलंबिले आहे. प्रशासक आणि सचिव जाणीवपूर्वक शेतकर्यांचा माल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी शेतकर्यांनी उठाव केला असता तालुका सहायक निबंधकांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी सचिवाने हरभरा खरेदी करण्याची परवानगी सोमवारपर्यंंतच असल्याचे सांगितले. यावर निबंधकांनी १५-२0 दिवसांपासून पडून असलेल्या हरभरा खरेदी का केला नाही, असा प्रश्न केला. त्यावर प्रशासक आणि सचिव उत्तर देऊ शकले नाही. त्याचवेळी निबंधकांनी तत्काळ खरेदी करण्याच्या सूचना सचिवांना केल्या. मात्र व्यापारी धार्जीण्या सचिव आणि प्रशासकाने हा आदेश धुडकावून लावला. शेतकर्यांना खरिपासाठी बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी माल विकणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन त्यांची अडवणूक सुरू आहे. प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
माल व्यापार्यांचा, सातबारा शेतकर्यांचा
By admin | Updated: May 22, 2014 01:35 IST