घाटंजी : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे येथे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर यांनी गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. घाटंजी शहर आणि तालुक्यातील विविध प्रश्नांचे निवेदन ना.पाटील यांना देण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. तत्पूर्वी ना.पाटील यांनी महाबलाय व्यायाम शाळेला भेट दिली. प्रसंगी त्यांचा शैलेश ठाकूर आणि महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. नगरपरिषदेचे शिक्षक अरुण पडलवार यांनी पदवीधरांचे प्रश्न यावेळी मांडले. या प्रसंगी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे, नगरसेवक संतोष शेंद्रे, सलिमभाई नगरिया, सलिमभाई छुट्टाणी, उमेश खांडरे, अतिश मंथनवार, अमित प्रधान, योगी सरवैया, पिंटू बोमिडवार, भौतिक पटेल, विनोद महाजन, हनुमान मडावी, शंकर लेनगुरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजीत वाढीव पोलीस बळ हवे
By admin | Updated: March 19, 2015 02:03 IST