तेलंगणा-मराठवाड्यातील तस्कर : विनाशस्त्र करावी लागते गस्त, वन अधिकारी मात्र फिरकत नाहीउमरखेड : पैनगंगा अभ्यारण्यातील मौल्यवान सागवान तोडण्याचा सपाटा वन तस्करांनी लावला असून त्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार वाढले आहे. सोमवारी झालेल्या हल्ल्यातही तीन वन कर्मचारी गंभीर जखमी झाले. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे वन कर्मचारी सागवान तस्करांच्या दहशतीत दिसत असून जंगलात गस्त घालण्यासाठी जाताना त्यांच्यावर दडपण दिसून येते. त्यातच विनाशस्त्र जंगलात जावे लागत असल्याने कर्मचारी गस्त घालण्यास टाळाटाळ करीत आहे.उमरखेड तालुक्याचे वैभव म्हणजे पैनगंगा अभयारण्य. या अभयारण्यात मौल्यवान सागवानासह वनऔषधी, वृक्ष मोठ्या प्रमाणात आहे. तसेच वाघ, बिबट, हरीण, अस्वल आदी प्राणी आहे. ४० हजार हेक्टर जंगलाच्या संरक्षणासाठी वन विभागाने खरबी, बिटरगाव आणि उमरखेड असे तीन वनपरिक्षेत्र तयार केले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु या जंगलात सागवान तस्करांचेच राज्य दिसून येते. तेलंगणा आणि मराठवाड्यातील सागवान तस्कर जंगलात शिरून मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी करतात. सोमवारी उघडकीस आलेल्या हल्लाप्रकरणाने सागवान तस्करीवर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वीही अनेकदा वन तस्करांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहे. बिटरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांना मराठवाड्यातील सागवान तस्करांनी २०१५ मध्ये ट्रॅक्टर अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. खरबी जंगलात बोरगे नामक वनरक्षकाला झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. दोन दिवस तो झाडाला बांधलेल्या अवस्थेत होता. पाच महिन्यांपूर्वी किनवट येथील रेती तस्करांनी वन विभागाच्या पथकावर हल्ला केला होता. आता सोमवारी मराठवाड्यातील तस्करांनी वन विभागाच्या पथकावर हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे या हल्ल्यातील एक हल्लेखोर वन विभागाच्या तावडीत अडकला आहे. यामुळे तस्करांची साखळी पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु वारंवार होणाऱ्या या हल्लयांमुळे वन कर्मचारी चांगलेच धास्तावले आहे. (शहर प्रतिनिधी)
सागवान तस्करांच्या दहशतीत वन कर्मचारी
By admin | Updated: May 5, 2016 02:39 IST