मोदी सरकार : गर्दी जमविण्यात अपयश, लोकप्रतिनिधी-पदाधिकाऱ्यांनीही फिरविली पाठयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला केंद्रात एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यवतमाळातसुद्धा वचनपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन भाजपाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात पक्षीय राजकारण घुसल्याने त्याचा फ्लॉप-शो झाला. आता त्याचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. बुधवारी स्थानिका महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ७ वाजता ‘प्रवास वचनपूर्तीचा’ हा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मात्र त्यांनाच येण्यास विलंब झाल्याने तब्बल तासभर उशिराने हा कार्यक्रम सुरू झाला. परंतु त्यानंतरही या कार्यक्रमाला गर्दी नव्हती. जनतेतून प्रतिसाद तर दूर भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही याकडे पाठ फिरविली. केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेसुद्धा या कार्यक्रमापासून दूर राहणेच पसंत केले. वास्तविक या कार्यक्रमासाठी आपल्या मतदारसंघातून भाजपा कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी जिल्ह्यातील पाचही आमदारांवर सोपविण्यात आली होती. मात्र बहुतांश आमदारांना त्यात अपयश आले. घाटंजी, आर्णी या तालुक्यातील मात्र बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. उमरखेडचे आमदार मलेशिया दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांचे उमरखेड-महागाव मतदारसंघातील कार्यकर्तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी ‘आम्ही रॅक पॉर्इंटचे उद्घाटन-आंदोलन केले’ असा बचाव घेतला. व्यक्तीश: ते कार्यक्रमाला हजर होते. राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके व यवतमाळचे मदन येरावार यांनीही गर्दीचा वाटा न उचलल्याने भाजपाचा हा जिल्हास्तरीय कार्यक्रम फेल गेला. अवघे अडीचशे ते तीनशे लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष असे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे हे राज्याबाहेर पर्यटनासाठी गेल्याने त्यांचीही ‘फौज’ दिसून आली नाही. कार्यक्रमाला गर्दीच नसल्याने आमदारांनी मार्गदर्शन करणे टाळले, त्यासाठी ‘कार्यक्रमाला आधीच विलंब झाला’ असे कारण पुढे केले गेले. या ‘फ्लॉप-शो’ची कार्यक्रम स्थळी चांगलीच चर्चा होती. त्यासाठी उपस्थित कार्यकर्ते नेत्यांवर आगपाखड करताना दिसून आले. कार्यक्रमाला गर्दी जमल्यास येथील आमदाराला त्याचे संपूर्ण श्रेय जाईल, त्यातून त्यांची ताकद दिसेल, त्याचा फायदा त्यांना आगामी मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी होईल, असा विचार करुन स्थानिक नेत्यांनी या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांसह येण्याऐवजी एकटेच येणे पसंत केल्याचे बोलले जाते. तर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असल्याने हेतुपुरस्सर तो फ्लॉप करून अप्रत्यक्ष त्यांना शह देण्यात आल्याची चर्चाही भाजपाच्याच गोटात आहे. भाजपाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश लोकप्रतिनिधी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच या वचनपूर्ती कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कम्युनिकेशन गॅप की प्रि-प्लॅन असा प्रश्न कार्यकर्ते आपसात उपस्थित करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) भाजपेत्तर आमदारांच्या मतदारसंघात मंत्रीमोदी सरकारने गेल्या वर्षभरात केलेली कामे, घेतलेले चांगले निर्णय आणि अच्छे दिनकडे सुरू असलेली वाटचाल जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपाने आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील खासदार-आमदार- स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर सोपविली आहे. जेथे भाजपाचे आमदार नाहीत तेथे राज्यातील भाजपाच्या मंत्र्यांना खास मिशन म्हणून पाठविले जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दारव्हा येथे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे ३० मे रोजी तर पुसद या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे उपस्थित राहणार आहे. मात्र यवतमाळ जिल्हा मुख्यालयीच भाजपाचा मुख्य कार्यक्रम फ्लॉप झाल्याने त्याचा परिणाम या दोनही कार्यक्रमांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारसंघात फ्लेक्स नाही यवतमाळ जिल्ह्यात वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ व उमरखेड या पाच मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. पर्यायाने तेथे मोदी सरकारची कामगिरी सांगणारे फलक प्रमुख गावांमध्ये व तालुका मुख्यालयी झळकणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात बहूतांश मतदारसंघात हे फलक लागले नाही. एवढेच काय यवतमाळ या जिल्हा मुख्यालयीसुद्धा असे कोणतेही फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे भाजपा आमदारांची पक्षाबाबत असलेली उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. नेत्यांनाच सोयरसुतक नसल्याने कार्यकर्तेही दूरच राहिले.
भाजपाच्या वचनपूर्ती कार्यक्रमाचा फ्लॉप-शो
By admin | Updated: May 29, 2015 00:08 IST