अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन झाले तरी भाजीपाला खरेदीसाठी गावागावात गर्दी होतच आहे. मात्र यावर नामी उपाय यवतमाळकरांनी शोधला आणि यशस्वीही केला. शहरात गेल्या तीन दिवसांपासून ‘सुरक्षित भाजी बाजार’ भरविला जात आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन सामाजिक संघटनेने सुरू केलेला हा बाजार महाराष्ट्रातील पहिला यशस्वी उपक्रम ठरला आहे.भाजीपाल्याची दुकाने म्हणताच सर्वत्र कचरा, आरडाओरड, दुर्गंधी असे वातावरण दिसते. कोरोनाच्या सावटात तर हे वातावरण अत्यंत धोकादायक ठरते. मात्र हा सर्व प्रकार टाळून यवतमाळच्या दर्डानगर परिसरातील दीपनगरात संकल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ‘सुरक्षित भाजी बाजार’ भरविला जात आहे. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे चहुबाजूंनी कापडी शामियाना लावून बाजार ‘बंदिस्त’ करण्यात आला. प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले. तेथून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आधी सॅनिटाईज केले जाते. आत प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातावर पुन्हा सॅनिटायझर दिले जाते. ग्राहक आत शिरताच त्याला आपण भाजी बाजारात आलो की मॉलमध्ये असा प्रश्न पडावा अशा प्रकारची दुकानांची रचना येथे करण्यात आली आहे.शामियानाच्या आत ‘बंदिस्त’ केलेल्या मैदानात सुरक्षित अंतर ठेऊन दुकानांची मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानदारालाही आत येताना सॅनिटाईज केले जाते. त्याहून महत्वाचे म्हणजे मास्क लावल्याशिवाय येथे दुकानदारांना आणि ग्राहकांना प्रवेशच दिला जात नाही. ३ मेपासून दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत भरणाऱ्या या बाजाराला प्रतिसाद मिळत आहे.प्रशासनाकडून दखलकोरोनाच्या संकटात नागरिकांंना जीवनावश्यक भाजीपाला सुरक्षित वातावरणात मिळावा यासाठी हा उपक्रम राबविल्याचे संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सचिव वसंत शेळके यांनी सांगितले. या बाजाराची उपयोगिता लक्षात घेऊन स्वत: निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी येथे भेट दिली. कोरोना काळात समाजकार्यासाठी सरसावलेल्या इतरही सामाजिक संघटनांनी अशा प्रकारचे अभिनव उपक्रम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पहिला ‘सुरक्षित भाजी बाजार’ यवतमाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST
या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे चहुबाजूंनी कापडी शामियाना लावून बाजार ‘बंदिस्त’ करण्यात आला. प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले. तेथून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आधी सॅनिटाईज केले जाते. आत प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातावर पुन्हा सॅनिटायझर दिले जाते. ग्राहक आत शिरताच त्याला आपण भाजी बाजारात आलो की मॉलमध्ये असा प्रश्न पडावा अशा प्रकारची दुकानांची रचना येथे करण्यात आली आहे.
पहिला ‘सुरक्षित भाजी बाजार’ यवतमाळात
ठळक मुद्देना गर्दी, ना कोलाहल : जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनेचा उपक्रम यशस्वी