यवतमाळ : संघटना आणि राजकीय दबाव मोडित काढत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हा परिषदेच्या ‘मुक्कामी’ शिक्षकांचा मुक्काम तालुक्याबाहेर हलविला. जिल्हा मुख्यालयातील यवतमाळ पंचायत समितीत विविध कारणांचा आधार घेत शिक्षक १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडून आहेत. मुख्यालयी राहण्यासाठी अनेकांनी संघटना, अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र याचा आधार घेतला होता. परंतु या सर्व बाबी धुडकावून लावत सीईओ दीपक सिंगला यांनी शेवटच्या दिवशी बदली प्रक्रिया राबविली. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत गोंधळ उडणार हे सर्वश्रृत होते. त्यामुळे ही प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरू करता आली नाही. २०१२ मध्ये ज्या शिक्षकांनी आपसी बदलीसाठी न्यायालयात धाव घेतली त्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दिलासा मिळाला तर अनेकांना आपल्या सोईचे ठिकाण सोडावे लागले. याच पद्धतीने केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती. आपसी बदलीनंतर प्रशासकीय, विनंती बदलीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अखेर दबाव झुगारून सीईओंनी शिक्षकांचा ‘मुक्काम’ हलविला
By admin | Updated: May 14, 2016 02:19 IST