निवेदन : शेतकरी संघटनेची मागणी, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारापुसद : वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च जास्त व हमीभाव कमी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हमीभाव व इतर मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करावे, अन्यथा शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी शासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. देशात ६५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च वाढला असूनसुद्धा हमीभाव मात्र कमी असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापसाचा हमीभाव सात हजार रुपये क्विंटल, तुर डाळ सहा हजार रुपये व सोयाबीन चार हजार रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव केंद्र व राज्य सरकारने वाढून द्यावा तसेच शेतीपंपासाठी सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन योजना द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, संपूर्ण कर्जमाफी शासनाने द्यावी, शेतकऱ्यांचा पीक विमा शासनाने भरावा, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात व इतर मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेच्या पुसद शाखेच्यावतीने उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांना देण्यात आले. सदर निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन यावेळी जाजू यांनी दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे संजय पोंगाडे, रमेश ठाकरे, नारायण पुलाते, शेख अयुब, गजानन ठाकरे, गजानन शामसुदंर, रवींद्र तायडे, गोपाल अडसड, विष्णू आडे, विजय सुकळकर, मनोहर ठाकरे, धनंजय तोंडारे, आप्पाराव मस्के, उत्तम जाधव, गजानन महाजन, प्रमोद शिंदे, नूर ठेकेदार, समाधान कन्हाळे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे
By admin | Updated: July 23, 2015 02:29 IST