बाभूळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीत मोजक्याच तुरीच्या ढिगांचा लिलाव आणि भाव पाडत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी धामणगाव-यवतमाळ राज्य मार्गावर बुधवारी ठिय्या देऊन चक्काजाम आंदोलन केले. यामुळे अर्धातास वाहतूक खोळंबली होती.बाभूळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी (एफसीआय) व व्यापाऱ्यांनी संगनमत करून तुरीचा भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी बुधवारी केला. तसेच बाजार समितीत लिलाव होऊ दिला नाही. जोपर्यंत एफसीआय खुल्या लिलावात उतरत नाही तोपर्यंत खरेदी होणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. एकाच प्रतीच्या दोन तुरीच्या ढिगांना मोठ्या फरकाने भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरत राज्य मार्गावर ठिय्या दिला. त्यानंतर बाभूळगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढली आणि रस्ता मोकळा केला. (प्रतिनिधी)
बाभूळगाव येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम
By admin | Updated: January 28, 2016 02:38 IST