बिटरगाव : परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्यांची प्रचंड लूट सुरू आहे. कृषी केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण अनेकांनी अद्याप केलेलेच नाही. तरीसुद्धा काही कृषी केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात तेही बोगस बियाण्यांची विक्री सुरू असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ येऊन ठेपले असल्याने तसेच उन्हाळी कापसाची लागवड परिसरात मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकर्यांनी कृषी केंद्रांवर एकच गर्दी केली आहे. याच गर्दीचा व शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी केंद्र चालकांकडून बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे. अशा कृषी केंद्रांना शोधून काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आव्हान जिल्हा कृषी विभागाकडे आहे. कृषी केंद्र चालकांना जे बियाणे एमआरपी किंमतीच्या अर्ध्या किंमतीत मिळतात किंवा ज्या कंपनीकडून त्यांचे बियाणे अधिकाधिक विक्री केल्यास भेटवस्तू अथवा मोठे पॅकेज दिले जाते, अशाच कंपन्यांचे बियाणे ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार सर्रास घडत आहे. असे बियाणे कसे चांगले आहे, हे विक्रेते अतिशय पद्धतशीरपणे ग्राहकांच्या गळी उतरवित असल्याचे दिसून येते. आंध्रप्रदेशातल बियाणे कंपन्यांचा महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात शिरकार झाला असून बिटरगाव सारखा जंगल भाग त्यांनी त्यांची बियाणी विक्रीसाठी प्रामुख्याने निवडला आहे. उल्लेखनिय म्हणजे बिटरगाव परिसरात सध्या सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांपैकी कुणाचाही परवाना नूतनीकरण केलेला नाही. तरीसुद्धा अशा केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात दररोज बियाण्यांची सर्रास विक्री सुरू आहे. यासंदर्भात उमरखेड पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस.के. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता सदर कृषी केंद्र चालकांनी जर विहित नमुन्यात परवाना नुतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल केले असेल तर त्यांना माल विकता येतो परंतु त्यांच्या परवाना नूतनीकरणाचा वैधता कालावधी संपला असेल तर त्यांना बियाणे व खते विक्री करता येत नाही. अशा कृषी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येइल. शेतकर्यांनी मात्र कृषी केंद्र चालकांकडून आपण घेतलेल्या मालाचे पक्के बिल घ्यावे. तसेच नामांकीत व विश्वसनिय कंपनीचेच बियाणे खरेदी करावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी शेतकर्यांना केले. (वार्ताहर)
कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्यांची सर्रास लूट
By admin | Updated: May 27, 2014 01:13 IST