विजय बोंपीलवार हिवरासंगमवीज वितरण कंपनीच्या कारभाराने त्रस्त आणि खंडित वीज पुरवठ्याने नुकसान सोसणाऱ्या महागाव तालुक्यातील अनंतवाडी येथील नऊ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरुद्ध एक कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचमध्ये दाखल केलेल्या या तक्रारीने एकच खळबळ उडाली आहे. महागाव तालुक्यातील अनंतवाडी आणि कवठा या गावातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. अनेक कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून जोडणी घेतली आहे. परंतु मे २०१४ पासून वीज पुरवठा खंडित आहे. याबाबत विचारणा केली तर डीपी जळाल्यामुळे वीज वितरण खंडित असल्याचे सांगितले जाते. या कालावधीत शेतकऱ्यांना ओलितासाठी विजेची आवश्यकता होती. अनेक शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व कपाशीची लागवड केली होती. परंतु ओलिताअभावी नऊ शेतकऱ्यांचे सुमारे प्रत्येकी एक लाख रुपये नुकसान झाले आहे. तक्रारकर्ते हे सधन शेतकरी असून ओलिताच्या माध्यमातून दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न काढतात. परंतु वीज वितरणच्या निष्काळीपणामुळे त्यांना याला मुकावे लागले. याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला सूचना दिली. निवेदन दिले परंतु त्यानंतरही नादुरुस्त डीपी दुरुस्त झाली नाही. शेवटी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात दावा दाखल केला. मारोतराव शेळके, बाळासाहेब मुधोळ, दौलतराव भारती, राजकमल गिरी, किसन मांगधरे, भाऊराव जगदाडे, नारायण भारती, रेखाताई मुधोळ, वसंता कदम यांनी हा दावा दाखल केला आहे. पुसद येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ नुसार हा अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांनी ठोकला वितरणवर एक कोटींचा दावा
By admin | Updated: December 20, 2014 02:13 IST