लोकमत न्यूज नेटवर्कवणी : उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा मारहाण करत गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली.सतीश नामदेव देवासे (२५) रा.तुकूम (चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे. वणी येथील रवीनगर भागात राहणाऱ्या अनिल आसूटकर यांच्या घरी किरायाने राहणारा युवक करण संतोष कश्यप याने रविवारी रात्री स्वत:च्या खोलीत दारू पाजून सतीशला मारहाण करीत गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी करण कश्यप पे्रताची विल्हेवाट लावण्यासाठी धडपड करीत असताना मदत मिळवण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र वणी पोलिसांनी अवघ्या चार तासात मोबाईलच्या लोकेशनवरून त्याला मंगळवारी रात्री नागपुरात बेड्या ठोकल्या. मृत सतीश देवासे व आरोपी करण कश्यप हे एका फायनान्स कंपनीत नोकरीला होते. तेथेच त्यांची मैत्री झाली. यादरम्यान करणने सतीशजवळून ६० हजार रूपये उसणवारीने घेतले होते. ते परत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सतीशने करणकडे तगादा लावला होता. रविवारी रात्री करणने सतीशला वणी येथे बोलावून घेतले. रात्री रविनगरमधील आपल्या रूमवर नेऊन त्याला दारू पाजली. त्यानंतर दोघात पैशावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर सतीशच्या खुनात झाले. घटनेनंतर करणने पुरावा नष्ट करण्यासाठी सतीशचे प्रेत प्लास्टिकच्या सिमेंटच्या पोत्यात बांधले. दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारनंतर घरातून उग्र वास येत असल्याने घरमालक आसुटकर यांनी करणला याबाबत विचारणा केली, तेव्हा घरात घूस मरण पावल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी करणच्या खोलीतून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागल्याने अनिल आसुटकर यांचा संशय बळावला. नंतर आसुटकर यांनी वणी पोलिसांना घरातून दुर्गंधी येत असल्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, घरात सतीशचे प्रेत आढळून आले. यावेळी करण कश्यप घरातून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी युक्ती वापरून करणशी मोबाईलवरून संपर्क केला असता, आपण घुग्घूस येथे असल्याची बतावणी केली. मात्र त्याचे मोबाईल लोकेशन नागपुरात होते. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे डी.बी.पथकासह नागपूरकडे रवाना झाले व तेथे जाऊन आरोपीला जेरबंद केले. आरोपी करण कश्यप हा मुळचा वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे, डी.बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, शेखर वांढरे, वासुदेव नारनवरे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, अविनाश बानकर, शेख ईकबाल, दीपक वांड्रसवार, अमित पोयाम, पंकज उंबरकर आदींनी केली.मारेकरी आयपीएल सट्ट्यात कर्जबाजारीमारेकरी करण कश्यप याला आयपीएल सट्ट्याचा नाद होता. या नादात तो प्रचंड कर्जबाजारी झाला. त्याच्यावर सध्यास्थितीत तीन लाखांचे कर्ज असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्याने सट्टा लावण्यासाठी वडिलांच्या नावे असलेली काही लाखांची आरडीदेखील विड्रॉल केल्याचे सांगितले जाते. आर्वी परिसरात त्याला ‘आयपीएल सट्टा’ या नावानेच ओळखले जाते. कर्जबाजारीपणातूनच त्याने गाव सोडले होते.
उधारीच्या पैशावरून खून झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST
आसुटकर यांनी वणी पोलिसांना घरातून दुर्गंधी येत असल्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, घरात सतीशचे प्रेत आढळून आले. यावेळी करण कश्यप घरातून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी युक्ती वापरून करणशी मोबाईलवरून संपर्क केला असता, आपण घुग्घूस येथे असल्याची बतावणी केली. मात्र त्याचे मोबाईल लोकेशन नागपुरात होते.
उधारीच्या पैशावरून खून झाल्याचे उघड
ठळक मुद्देवणीतील घटना : मारेकरी युवक चार तासात नागपुरातून जेरबंद