३४ मिमी : १६ घरांची पडझड, पारवा-पांढरकवडा मार्ग पुरामुळे बंद यवतमाळ : काही भागात धो धो, तर काही भागात थेंबही नाही, अशी पावसाची जिल्ह्यात परिस्थिती होती. मात्र गेली २४ तासात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात झालेल्या पावसाची ३४ मिमी एवढी नोंद करण्यात आली आहे. यासोबतच शेतीच्या कामाला गती आली आहे. पारवा-पांढरकवडा मार्ग बंद वगळता जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नाही. १६ घरांची अंशता पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे.गेली १५ दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. पाऊस झालेल्या भागात शेतीकामाला वेग आला होता. जवळपास ९० टक्के पेरण्या या भागात पूर्ण झाल्या. मात्र काही भागात तुरळक पाऊस झाल्याने शेतीची कामे अतिशय संथ गतीने सुरू होती. मात्र शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस संततधार नसला तरी, पेरणीयोग्य असल्याने शेतीकामाला गती आली आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी वाढली आहे. काही भागात नाले दुथडी भरून वाहत होते.जिल्ह्यातील नऊ लाख ४०० हेक्टरपैकी दोन लाख ६४ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. सात लाख हेक्टरवरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतीकामाला गती मिळाली आहे. मागील २४ तासात सर्वाधिक ८९ मिमी पावसाची नोंद केळापूर तालुक्यात करण्यात आली आहे. सर्वात कमी पाऊस महागाव तालुक्यात पाच मिमी इतका झाला आहे. (शहर वार्ताहर)सोमवारीही मुसळधार पावसाचा इशारापारवा ते पांढरकवडा मार्गावरील झुली पुलावर पाणी चढल्याने तब्बल अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी ही समस्या निर्माण होते. परिसरात गेली दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी या पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. परिणामी माहूर, उनकेश्वर, आर्णी, माहूर, उमरखेडकडे जाणारी वाहने थांबली होती.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By admin | Updated: June 22, 2015 02:12 IST