यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील देवनगर आणि नेर तालुक्यातील अशोकनगर या दोन्ही अतिक्रमीत वस्तीला नियमित करण्यात येत आहे. यासाठी अनेक वर्षापसून सुरू असलेल्या लढ्याची यशस्वी सांगता होणार आहे.देवनगर आणि अशोकनगर येथील लोकवस्तीचे अतिक्रमण नियमित व्हावे याकरीता बुधवारी मुंबई येथे महसूल, नगररचना, नगरपरिषद आदी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत देवनगर व अशोकनगर या लोकवस्तींना अधिकृत लोकवस्तीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या दोन्ही वस्तींच्या नियमिततेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या संदर्भात शासनस्तरावरून निर्णय होईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. दिग्रस तालुक्यातील देवनगर व नेर तालुक्यातील अशोकनगर येथे शेकडो नागरिक गेल्या ५० वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. पालकमंत्र्यांनी येथील नागरिकांच्या विनंतीवरून या लोकवस्तीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न चालविले होते. दरम्यानच्या काळात दोन्ही शहरातील हा भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने ही जमीन आता गायरान राहिलेली नाही. त्यामुळे एप्रिल २००२ मध्ये निघालेल्या शासन आदेशाप्रमाणे या भागाला नियमानुकूल करण्यात यावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू होते. १८ मार्च रोजी ना. राठोड यांनी मुंबई येथे मंत्रालयात महसूल विभागाचे उपसचिव, नगररचना विभागाचे अधिकारी, पुसद व दारव्हा येथील उपविभागीय अधिकारी, दिग्रस, नेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक आदींची बैठक घेऊन या दोन्ही लोकवस्तीच्या नियमिततेसंदर्भात आढावा घेतला. सदर बैठकीत हे अतिक्रमण शासनाच्या निदेर्शाप्रमाणे नियमानुकूल करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. (कार्यालय पतिनिधी)
दिग्रसमधील अतिक्रमण नियमित
By admin | Updated: March 20, 2015 01:58 IST