ग्रामपंचायतींची रणधुमाळी : वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगावात इच्छुकांमध्ये चढाओढ यवतमाळ : शहरालगतच्या वडगाव, लोहार, वाघापूर, पिंपळगाव ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा फिव्हर चढला आहे. सर्वच प्रमुख पक्ष येथे आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहे. येथील निवडणूक आॅगस्ट महिन्यात होेऊ घातली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे.ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढली जात नसली तरी येथे आपला प्रभाव राहावा, असा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जातो. विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राजकीय समीकरणच बदलेले आहे. आतापर्यंत शहरालगतच्या ग्रामपंचायतींवर काँग्रेस आणि राष्ट्रवादींचे कायम वर्चस्व राहिले आहे. शिवसेना ही केवळ वाघापूर पुरतीच मर्यादित होती. भाजपने कधीच ग्रामीण भागाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे लोहार आणि वडगावात अपवादात्मक प्रतिनिधीत्व त्यांच्याकडे होते. या पाच प्रमुख ग्रामपंचायतीवर ताबा मिळविणे मतदारसंघ बांधणीसाठी आवश्यक आहे. मात्र येथे सातत्याने काँग्रेस धार्र्जिण्या सदस्याचीच संख्या अधिक राहिली आहे. आता सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेकडून स्वतंत्ररित्या वर्चस्वासाठी प्रयत्न केले जात आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना वळविण्यात येत आहे. यामुळे पक्षांतराला वेग आला आहे. पक्षाच्या विस्तारासाठी भाजप-सेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला अस्तित्वासाठी झटावे लागणार आहे. वडगाव ग्रामपंचायतीत ग्रामसुधार समितीचे सातत्याने वर्चस्व राहिले आहेत. आतासुध्दा त्यांची जादू कायम राहणार काय याकडे लक्ष आहे. वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. कोणता पक्ष, पदाधिकारी आपल्याला सोयीचा ठरणार याचा अंदाज घेऊनच इच्छूक आपले पत्ते उघडत आहे. सध्यातरी महिला आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले आहे. याच विरोधात दाद मागण्यासाठी आक्षेप घेतले, यावर सोमवारी सुनावणी होत आहे. लोहारा येथे काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आजपर्यंत राहिला आहे. त्या पाठोपाठ भाजप, शिवसेना, बसपाला प्रतिनिधित्व मिळाले. वाघापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस तुल्यबळ आहेत. पिंपळगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तेथेही बदलाचे वारे सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
यवतमाळ ग्रामीणमध्ये निवडणूक ज्वर चढला
By admin | Updated: February 8, 2015 23:39 IST