लोकमतविशेष
भूमिहिनांचे स्वप्न भंगले : हवे ११ कोटी, मिळाले केवळ ४५ लाखरूपेश उत्तरवार यवतमाळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभीमान योजने अंतर्गत शेतजमीन खरेदीत आर्थिक खोडा निर्माण झाला असून शेतजमिन खरेदीसाठी ११ कोटींची मागणी असताना जिल्ह्याला केवळ ४५ लाख रुपयेच मिळाले आहे. परिणामी २९५ हेक्टर शेतजमिनीची खरेदी रखडली असून भूमालक होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. भूमिहिनांना शेतजमीन देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी २००४ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभीमान योजना सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील भूमिहिनांसाठी २९५ हेक्टर जमीन हवी आहे. जमीन खरेदीसाठी ११ कोटींची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात समाज कल्याण विभागाकडे यासाठीचा निधीच वळता झाला नाही. सदर योजनेत जमीनीच्या एकूण किमतीपैकी ५० टक्के रक्कम अनुदान स्वरुपात दिली जाते. ५० टक्के रक्कम लाभार्थ्याला भरायची असते. लाभार्थ्याने शेती खरेदी केल्यानंतर पुढील दोन वर्षात कर्जाची परतफेड करायची असते. यात कर्ज परतफेडीसाठी १० वर्षाचे समान हप्ते पाडले जातात. योजना अंमलबजावणीच्या पहिल्या वर्षी १२६९ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली होती. यासाठी जिल्ह्याला ३०० कोटी रुपये मिळाले होते. २०१४ मध्ये ३४ एकर जमीन मिळाली. मात्र निधी नसल्याने खरेदी रखडली. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यात ११२ लाभार्थी निवडले गेले. त्यांच्यासाठी २९५.४२ आर हेक्टर शेतजमीन खरेदीसाठी ११ कोटी लागणार आहे. मात्र केवळ ४८ लाख रुपये जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. अपुऱ्या निधीमुळे शेतजमीन खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भूमिहिनांचे शेत मालक होण्याचे स्वप्न भंगले आहे. आता या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र मुळातच आर्थिक तरतूद नसल्याने शेतजमीनीसाठी पैसा मिळणार की, नाही हा प्रश्न अधांतरी आहे.