लाभार्थी वंचित : पुरवठा विभागाच्या संगनमताने चालतो काळाबाजारमहागाव : वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी स्वस्त धान्याचे दुकाने जोडून असलेले दुकानदार लाभार्थ्यांना धान्यच देत नाही. कोणत्या तारखेला धान्य आले, किती लोकांना वाटले, किती शिल्लक आहे याचा काहीच ताळमेळ जुळत नाही. तालुक्यातील कोणत्याच गावात स्वस्त धान्य दुकानातून धान्य व साखर मिळत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहे.अतिरिक्त दुकान जोडून देण्यासाठी महागाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील वरिष्ठ लिपिकाचा पाच हजार रुपये भाव ठरलेला आहे. नागरिकांच्या कितीही तक्रारी आल्या तरी त्या पाठीशी घालण्यासाठी सदर बाबू व पुरवठा निरीक्षकांचा भाव हा वेगळा ठरलेला आहे. पुरवठा विभागातील या भ्रष्ट प्रणालीमुळे शिधापत्रिकाधारक गोरगरीबांना धान्य, रॉकेल, साखर मिळणे दुर्मिळ झाले आहे. येथील प्रभारी तहसीलदारांचेही या भ्रष्ट यंत्रणेला पाठबळ मिळत असल्याने गोरगरीबांना आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. महागाव शहरातील रॉकेलचे आठ किरकोळ परवाने गेल्या अडीच वर्षांपासून वडद या ठिकाणी ३० किलोमीटर अंतरावर जोडून देण्यात आले आहे. सदर परवानाधारकाकडे या आधीच अन्य गावचे धान्य व रॉकेलचे परवाने जोडण्यात आले आहे. परंतु या सर्व ठिकाणी शासनाच्यावतीने दिले जाणारे कोणतेही धान्य व रॉकेल लाभार्थ्यांना मिळतच नसल्याच्या शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी आहेत. महागाव शहरात १५ हजार लोकसंख्या असून अन्य तीन परवाने असताना जाणीवपूर्वक पैशाच्या लाभापायी पुरवठा विभागाने महागावातील आठ परवाने वडद येथे जोडून दिले आहे. वडद येथील परवानाधारकाचे आॅपरेशन झाले असून गेल्या सहा महिन्यांपासून महागावातील शिधापत्रकाधारकांना रॉकेल मिळाले नाही. सदर दुकानदाराचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही. शहरातील अन्य तीन दुकानदारांचा कोठेही ठावठिकाणा लागत नाही. सेवादासनगरातील शेकडो शिधापत्रिकाधारक तहसील कार्यालयावर धडकले होते. येथील धान्य दुकानदाराविरोधात नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. काळ्याबाजारात मात्र रॉकेल व धान्य सहज उपलब्ध होते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)
महागाव तालुक्यात धान्य वितरणात घोळ
By admin | Updated: April 28, 2016 02:25 IST