महागाव : शून्य टक्के सिंचन असणाऱ्या जामनाला व आमडापूर प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनसंजीवनी समजल्या जाणाऱ्या वेणी येथील लोअर पूस प्रकल्पाला क्षमतेप्रमाणे सिंचन होण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता असताना या निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांची आढावा बैठक घेतली. यावेळी जामनाला प्रकल्पाला दीड कोटी रुपये तर आमडापूर प्रकल्पाला साडे सात कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. परंतु तालुक्यातील विकासात अतिशय महत्वपूर्ण असलेल्या लोअर पूस प्रकल्पाला वंचित ठेवण्यात आले. नऊ हजार २०० हेक्टर सिंचनाची लोअर पूस प्रकल्पाची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र चार हजार हेक्टर सिंचन कसेबसे होते. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांच्या अस्थरीकरणासाठी पाच कोटी रुपये निधी मिळावा असा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडला आहे. अनेक ठिकाणी कालवे नादुरूस्त आहेत. पुरेसे कर्मचारी नाहीत, जे कालवे सुरू आहेत अशा कालव्यांमध्ये लिकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक आमदारांनी या दिशेने प्रयत्न केले असते तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या जिल्ह्यातील आमदारांच्या आढावा सभेत निश्चितच निधीची तरतूद झाली असती. तालुक्यात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प १९८५ मध्ये निर्माण झाला. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हा प्रकल्प सिंचनासाठी वरदान ठरणार आहे. परंतु आजी, माजी आमदारांनी या प्रकल्पाबाबतच्या समस्या कधीच जाणून घेतल्या नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असताना महागाव तालुक्यातील अतिशय महत्वपूर्ण लोअर पूस प्रकल्पाला वगळण्यात आले आहे. लोअर पूस प्रकल्पावर या परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे यापूर्वीसुद्धा नागरिकांमधून वेळोवेळी या प्रकल्पासाठी निधी खचून आणण्याची मागणी सबंधित लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. परंतु परिसरातील लोकप्रतिनिधी याकडे गांभिर्याने लक्ष देण्यास तयार नाही. सिंचन व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. या भागातील आमदारांनी योग्यरित्या या प्रकल्पाच्या समस्यांकडे लक्ष दिले असते आणि ही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे सिंचनासाठी शासनाने भरीव असा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
लोअर पूसला पुन्हा एकदा चकमा
By admin | Updated: January 7, 2015 23:00 IST