अनेकांची फसवणूक : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे आवाहनयवतमाळ : रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली काही कंपन्या गुंतवणूकदार, ठेविदारांची फसवणूक करीत आहे. नागरिकांनी अशा प्रलोभनांना भुलून रक्कम गुंतवू नये, असे आवाहन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केले आहे.आर्यरुप टुरीझम अॅन्ड क्लब रिसोर्ट कंपनी, केबीसी ओम फायनान्स, कल्पवृक्ष, श्रीसूर्या फायनान्स कंपनी, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट अशा अनेक कंपन्यांमध्ये ठेवीदारांनी गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यांनी ठेवीदारांच्या ठेवी व व्याज दिलेल्या वेळेस देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कंपन्याविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले असून तपास सुरु आहे. यापैकी आर्यरुप टुरीझम अॅन्ड क्लब रिसोर्ट कंपनीविरुद्ध नोंद असलेल्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत आहे. या कंपन्या तीन महिन्यांमध्ये दुप्पट, पाच महिन्यात दुप्पट, गुंतविलेल्या रकमेवर भरपूर व्याजाचा मोबदला अशी प्रलोभने दाखवितात. वर्तमानपत्राद्वारे जाहिराती देऊन स्थानिक स्तरावर एजंटांची नेमणूक करतात. अशा एजंटांना गुंतवणुकीवर भरपूर कमिशन दिले जाते. कमिशनमुळे असे एजंटही नातेवाईक तथा मित्रांना गुंतवणूक फायद्याचे असल्याचे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडते. ठेवी घेताना रिझर्व बँक व सेबीची मान्यता आवश्यक असते. अशी मान्यता या कंपन्या घेत नाही. आवश्यक परवानग्याही त्यांच्याकडे नसतात. कंपनी अॅक्टप्रमाणे रजिस्ट्रारकडे नोंदणीही आवश्यक असते. मात्र हे सगळे नसताना ठेवीदाराची फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या कमाई योग्य ठिकाणीच गुंतवणूक करावी. एखादी वित्तीय संस्था जनतेकडून ठेवी गोळा करीत असल्यास त्याबाबत सीआयडी, ०७२३२-२४३३०६ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक एस.डी. सोळंके यांनी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
दामदुपटीच्या प्रलोभनांना भुलू नका
By admin | Updated: July 18, 2015 02:26 IST