संचालक मंडळाच निर्णय : राज्य सहकारी बँकेकडे करणार १६ कोटींसाठी शिफारस यवतमाळ : पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला १६ कोटींचे कर्ज नाकारण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याच वेळी या कर्जासाठी राज्य सहकारी बँकेकडे शिफारस करण्याचेही ठरविण्यात आले. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात पीक कर्ज, वसुली, नव्या शाखा, एटीएम, कर्जाचे पुनर्गठण, खरीप व रबीतील कर्जाची स्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. वसंत सहकारी साखर कारखान्याला १६ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्तावही संचालक मंडळापुढे आला. यावेळी कारखान्याच्या कर्जाचा जुना हिशेब पुढे ठेवला गेला. या कारखान्याला जिल्हा बँकेने आधीच ४५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. कारखान्याच्या गोदामात साखर पडून आहे. या साखरेच्या तारणावर हे कर्ज दिले गेले. सध्या एवढे मोठे कर्ज देण्याची बँकेची आर्थिक व्यवस्था नाही. गेल्या वर्षी राज्य सहकारी बँकेवर संचालक मंडळ नसल्याने जिल्हा बँकेने सुमारे २० कोटींचे कर्ज मंजूर केले होते. परंतु यावर्षी राज्य बँकेवर पूर्ण सदस्यीय प्रशासक मंडळ आहे. त्यामुळे हे मंडळ कर्ज वाटपाचा धोरणात्मक निर्णय घेऊ शकते. म्हणून वसंत साखर कारखान्याला जिल्हा बँकेने कर्ज न देता राज्य सहकारी बँकेकडे त्यासाठीची शिफारस करावी, असे या बैठकीत ठरविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा बँक संचालक मंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुसद, उमरखेड व हदगावच्या आमदारांची येथील शासकीय विश्राम भवनावर आज बैठक घेण्याचे ठरले होते. तेथे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व सीईओंना पाचारण करून वसंत साखर कारखान्याला कर्ज देण्याबाबत चर्चा केली जाणार होती. मात्र बँकेने आधीच कर्ज देण्याबाबतच्या असमर्थतेचे संकेत दिल्याने आमदारांची ही बैठक बारगळल्याचे सांगितले जाते.
जिल्हा बँकेने ‘वसंत’ला कर्ज नाकारले
By admin | Updated: August 15, 2015 02:28 IST