लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुन्हेगारीची पाळेमुळे आता ग्रामीण भागातही पोहोचली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या हत्याकांडात अग्निशस्त्राचा सर्रास वापर करण्यात आला आहे. देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या जात आहे. गुरुवारी रात्री दारव्हा रोडवरील ढाब्यावर किरकाेळ वाद झाला. या वादात एका युवकाने चक्क देशी कट्टा रोखला. त्यानंतर तेथून त्यांनी पळ काढला. याप्रकरणी भीतीपोटी संबंधिताने तक्रार दिली नाही. दारव्हा मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या ढाब्यावर तीन युवक जेवणासाठी आले. त्यांनी ऑर्डर केली. जेवण आटोपले. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ढाबा बंद होत असताना पार्सल घेण्यासाठी दोघे जण आले. जेवण करून बाहेर निघालेल्या तिघांनी जाता-जाता त्या दोघांना टॉन्ट मारला. यातून वाद पेटला. या वादात बाहेर पडत असलेल्या युवकाने देशी कट्टा काढून रोखला. काही मिनिटातच झटापट करणाऱ्यांनी माघार घेऊन काढता पाय घेतला. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. हा प्रकार पोलिसांना माहीत होताच त्यांनी चौकशी सुरू केली. शुक्रवारी सकाळी लोहारा पोलिसांचे पथक त्या ढाब्यावर पोहोचले. देशी कट्टा निघाल्याच्या माहितीला पुष्टी मिळाली. तक्रारदाराचाही शोध लागला, मात्र तो फिर्याद देण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
दारव्हा मार्गावरच्या गावातील तरुण - ढाब्यावर देशी कट्टा रोखून दहशत पसरविणारा युवक दारव्हा मार्गावरील २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. दोन हजार वस्तीच्या गावात देशी कट्टा पोहोचला हे समाज स्वास्थ्यासाठी घातक आहे. काही दिवसांपूर्वीच भांबराजा येथे देशी कट्ट्यातून गोळी झाडून बाजार समिती संचालकाची हत्या झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.