यवतमाळ : नगरपालिकांचे पावसाळ्यातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी यवतमाळ शहरासह बहुतांश ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन चिडीचूप असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातील ३८ रुग्ण यवतमाळ शहरातील आणि मागास वस्त्यांमधील असल्याचे पुढे आले आहे. हा उद्रेक वाढण्यामागे अस्वच्छता कारणीभूत ठरली आहे. नगर परिषद प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. यवतमाळ शहरातील स्लम एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये हा उद्रेक माेठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
भारतनगर, चमेडियानगर, अंबिकानगर, तलाव फैल, गवळीपुरा, पंचशील चाैक, पावर हाऊस, धोबीघाट, अशोकनगर, इंदिरानगर, गोदाम फैल, वंजारी फैल, उमरसरा आणि नागरी वस्त्यांमध्ये हा उद्रेक पाहायला मिळतो आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहेत.
चिकनगुनियाचे आढळले ६ रुग्ण
काही वर्षांपूर्वी चिकनगुनिया आजाराने जिल्ह्यामध्ये थैमान घातले होते. आता डेंग्यूसोबत चिकनगुनिया आजारही आपले डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. अस्वच्छतेतून पसरलेला हा आजार डासांच्या उपद्रवाने वाढल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. यासोबत नेर आणि वटफळीमध्ये मलेरियाचे २ रुग्ण आढळले आहेत. शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने अशा प्रकारचा उद्रेक ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना केली जात नाही.
खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा
जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येतील सर्वाधिक उच्चांकी रुग्णसंख्या डेंग्यूमध्ये पाहायला मिळाली आहे. गतवर्षी डेंग्यूचे १२५ रुग्ण होते. यावर्षी हा आकडा १९६ वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय आणि खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. विजय आकोलकर यांनी सांगितले.