जिल्हा परिषद : कार्यमुक्तीसाठी सीईओंची विभाग प्रमुखांना तंबी यवतमाळ : बदली झाल्यानंतर मुख्यालयी प्रतिनियुक्ती मिळवून अनेकांनी आपले बस्तान जिल्हा परिषदेत बसवीले होते. या सर्व कर्मचार्यांची तत्काळ उचलबांगडी करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे. विविध विभागात कार्यरत दीडशेच्यावर कर्मचार्यांना आता आपले बस्तान गुुंडाळावे लागणार आहे. यामुळे प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्यांत खळबळ उडली आहे. मुख्यालयातून बदली झाल्यानंतरही नव्या आस्थापनेवर रुजू न होता कर्मचार्यांकडून प्रतिनियुक्तीसाठी खटाटोप केला जात होता. अधिकारी, पदाधिकार्यांची मर्जी सांभाळून अनेकजण मुख्यालयीच आहे. अशा कर्मचार्यांचा मोठ्या प्रमाणात भरणा जिल्हा मुख्यालयी आणि काही पंचायत समितीमध्ये झाला आहे. या कर्मचार्यांना कोणीच बिघडवू शकत नाही, अशा अर्विभावात ते वावरत होते. प्रत्येकाने आपला एक गॉडफॉदर तयार केला होता. त्यांच्या पाठबळावर हुकुमत सुरू होती. मध्यंतरीच्या काळात प्रतिनियुक्त कर्मचारी आणि पूर्णवेळ कर्मचारी यांच्यात वारंवार खटके उडत होते. याशिवाय जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांनी मुख्यालयी येऊच नये अशी स्थिती निर्माण केली होती. मुख्यालयी इतर कोणाला काम करता येत नाही, असे चित्र पध्दतशीर पणे निर्माण करण्यात आले होते. याला वरिष्ठ अधिकारी वर्गही भुलला होता. प्रतिनियुक्ती कर्मचार्यांच्या भरवशावर कामकाज चालवणारी यवतमाळ जिल्हा परिषद ही एकमेव असावी. हा प्रकार बघून नव्याने आलेल्या कोणत्याही अधिकार्यांना धक्काच बसत होता. ही बाब ‘लोकमत’ने वारंवार उजागर केली. याचीच दखल घेवूवन सीईओ मल्लिानाथ कलशेट्टी यांनी प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व कर्मचार्यांना तत्काळ मुळ आस्थापनेवर रुजू होण्याचे आदेश दिले. या कर्मचार्यांना विभाग प्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच बीडीओंनी हे कर्मचारी रूजू झाल्याचा अहवाल द्यावा अशी सूचना दिली आहे. यात दिरंगाई करणार्या विभाग प्रमुखाला जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे. मूळ आस्थापनेवर रुजू न होणार्या प्रतिनियुक्त कर्मचार्यांचे वेतन काढण्यात येवू नये, असे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्हा मुख्यालयी पंचायत, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, वित्त, कृषी, समान्य प्रशासन यासह इतर ही विभागात कार्यरत असलेल्या दीडशेच्यावर कर्मचार्यांना आता आपले बस्तान गुुंडाळावे लागणार आहे. सीईओंच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्मचार्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. आता मुख्यालयी आपल्यालाही कामाची चुणूक दाखविण्याची संधी मिळेल असा, विश्वास व्यक्त केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
दीडशेवर कर्मचार्यांची प्रतिनियुक्ती अखेर रद्द
By admin | Updated: May 20, 2014 00:00 IST