शेतकरी अडचणीत : पेरणीयोग्य पाऊस, बियाण्यांची मात्र सोय नाही महागाव : महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणाचे प्रस्ताव पूर्ण झाले असले तरी बँकेत पुरेसा पैसा नसल्याने अद्यापही कर्ज वाटपास प्रारंभ झाला नाही. तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील १९ हजार शेतकरी सभासदांना बँकेने दार बंद केले आहे. २०१३ मध्ये अतिवृष्टी, २०१४ मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने १९ हजार शेतकऱ्यांना कर्ज भरता आले नाही. अशा कर्जदार सभासदांपैकी एक हजार ५३८ शेतकऱ्यांनी कशी तरी कर्जफेड केली. चार हजार २७३ सभासद पुनर्गठण कर्ज प्रकरणाच्या निकषात बसले आहेत. अशा शेतकऱ्यांना कर्जाची अपेक्षा आहे. ते बँकेत येरझारा मारत आहे. परंतु बँकेत पुरेसा निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. यामुळे पुनर्गठणातील शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यायाने त्यांना बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पैसाच नाही. वेळ निघून गेल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा तेच दिवस पहायला मिळणार आहे. पुनर्गठणात दोन हप्ते पाडून देण्यात आले आहे. महागाव तालुक्यातील सहकार क्षेत्रावर ज्यांचे नियंत्रण आहे त्यांचे नियंत्रण हाताबाहेर गेल्याने सोसायट्या डबघाईस आल्या आहेत. वाटप आणि वसुली यात सोसायट्यांचा ताळमेळ जुळत नसल्याने तालुक्यातील सात सोसायट्यांचे अधिकार गोठविण्यात आले आहे. केवळ कर्ज वाटपाचे अधिकार गोठवून सहकार विभागाने हातवर केल्याने अशा सोसायट्यातील कोट्यवधी रुपये कोणत्या मार्गाने शेतकऱ्यांच्या खिशात गेले हे शोधणे गरजेचे आहे.सात सोसाट्यातून १३ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करण्यात आल्याने फुलसावंगी जिल्हा बँकेतील १०० शेतकरी सभासदांवर गुन्हे नोंदविण्यात आले. परंतु बनावट कागदपत्रे कोणी तयार केली याचा शोध मात्र पोलिसांना अद्यापही लागलेला नाही. अशातच हिवरा बँकेतील बनावट लाखो रुपयांच्या कर्ज वाटपाची चौकशी जिल्हा बँकेने गुंडाळून ठेवली आहे. कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आलेल्या सोसायट्यांमध्ये धनोडा, लेवा, शिरपूर, माळेगाव, हुडी, वरोडी, मुडाणा या सात सोसायट्यांचा समावेश आहे. या सोसायट्यांनी चालू कर्जाच्या २५ टक्के रकम भरणा केली नसल्याने त्यांचे अधिकार गोठविण्यात आले आहे. या सोसायट्यातील दोन हजार ६९२ सभासद थकीत आहे. सात सोसायट्यामधील सभासदांकडून १३ कोटी ५१ लाख रुपये येणे बाकी आहे. वाटप करण्यात आलेले कर्ज संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहे. काही सभासदांना कर्ज वाटपाची माहितीसुद्धा नव्हती. सोसायट्यातील कर्ज वाटप म्हणूनच रखडले गेले. परिणामी सभासद थकीत यादीत येऊन बसले. त्यामुळे १४ हजार शेतकरी सभासदांना बँकांनी कर्ज नाकारले आहे. एकीकडे १४ हजार सभासदांना कर्ज नाही तर पुनर्गठणात बसलेल्या चार हजार २७३ सभासदांना बँकेत पैसा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. (शहर प्रतिनिधी)हिवरा परिसरातील शेतकरी रुपांतरणाच्या प्रतीक्षेत हिवरासंगम : महागाव तालुक्यातील हिवरा परिसरातील ९५० थकीत शेतकरी रुपांतरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र रुपांतरण झाले नाही. पेरणी योग्य पाऊस होऊनही अनेक शेतकऱ्यांची बियाण्यांचीच सोय नाही. त्यामुळे शेती पडिक राहण्याची भीती आहे.गत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा होत आहे. त्यामुळे सहकारी संस्थेच्या शेतकरी सभासदांची थकीत कर्जदारांच्या यादीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांसोबतच सहकारी संस्थाही डबघाईस आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हिवरा शाखेला जोडलेल्या सात सेवा सहकारी संस्थांमध्ये ९५० थकीत सभासदांचे कर्ज रुपांतरण झालेच नाही. शेतकरी दररोज बँकांकडे चकरा मारीत आहे. हिवरा सोसायटीच्या २५६ सभासदांकडे ८५ लाख २१ हजार रुपये थकीत आहे. पोहंडूळ सोसायटीच्या ३६१ सभासदांकडे ७५ लाख ७४ हजार थकीत रक्कम, धनोडा सोसायटीच्या ४३ सभासदांकडे २३ लाख ५३ हजार, खडका सोसायटीच्या ७९ सभासदांकडे २६ लाख २० हजार, शिरपूर सोसायटीच्या ११५ सभासदांकडे ३९ लाख ४० हजार, लेवाच्या ४९ सभासदांकडे २० लाख रुपये थकीत आहे. सात सहकारी संस्थेच्या जवळपास ९५० शेतकरी सभासदांकडे पाच कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज थकीत असून अद्यापपर्यंत कर्जाचे रुपांतरण झाले नाही. हिवरा परिसरात पेरणी योग्य पाऊस झाला. परंतु कर्ज न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीची सोय नाही. त्यामुळे शेती पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या सातही सोसायट्यांनी आपआपल्या संस्थेकडील सभासदांच्या रुपांतरण करून याद्या मध्यवर्ती बँकेच्या हिवरा शाखेला हमीपत्रा सहित दिले आहे. परंतु जिल्हा बँकेकडून कोणत्याही शाखेला नवीन कर्ज वाटपासंदर्भात निर्देश प्राप्त झाले नाही.
कर्ज पुनर्गठणाचे गाजर, बँकेत पैसा नाही
By admin | Updated: June 20, 2015 00:23 IST