रवींद्र चांदेकर - वणीवर्षातून एकदा येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला माहेरी जाऊन भावाच्या हाताला राखी बांधण्याची आस प्रत्येकच बहिणीला असते. मात्र वणी तालुक्यातील रांगना येथे रक्षाबंधनासाठी आलेल्या एका बहिणीवर भावाचे कलेवरच पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. लाडक्या भावाचा रक्षाबंधनाच्या दिवशीच डोहात बुडून मृत्यू झाल्याने तिच्या दु:खाला पारावार उरला नाही. संजय गंगाधर पाऊणकर (१९) असे मृत भावाचे नाव आहे. तो वणी तालुक्यातील रांगना येथील रहिवासी आहे. शनिवारी सकाळी तो आपल्या शेतात कामासाठी गेला होता. जेवण केल्यानंतर संजय वर्धा नदीवर दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाणी पिण्यासाठी गेला. आपल्याजवळील डबकीत पाणी भरत असताना अचानक वर्धा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. आलेल्या मोठ्या लोंढ्यासोबत संजय वाहून गेला. त्याची गावकऱ्यांनी शोधाशोध केली. मात्र थांगपत्ता लागला नाही. इकडे त्याची विवाहित बहीण सपना वणी तालुक्यातील वांजरी येथून राखी बांधण्यासाठी राखी घेऊन रांगनात पोहोचली. मात्र तिला भाऊ वर्धा नदीत वाहून गेल्याची वार्ता कळली. या प्रकाराने संपूर्ण गावच हादरुन गेले. शोध घेऊनही संजयचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर महसूल प्रशासनाने रविवारी यवतमाळवरून आपत्ती निवारण कक्षाच्या बचाव पथकाला पाचारण केले. या पथकाने त्याचा शोध सुरू केला. अख्खा गाव वर्धा नदीच्या तीरावर गोळा झाला होता. दरम्यान रविवारी सायंकाळच्या सुमारास संजयचा मृतदेह रांगनानजीकच्या डोहात आढळून आला. रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीवर नियतीने दुर्दैवी वेळ आणली. तिने सोबत आणलेली राखी तशीच राहिली. सायंकाळी शोकाकूल वातावरणात संजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बहिणीने फोडलेला टाहो अनेकांच्या हृदयाला चिरुन गेला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला आपल्या भावाचे कलेवर पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. गावातील प्रत्येक जण हळहळत होता.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: August 10, 2014 23:12 IST