यवतमाळ : गेली कित्येक वर्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या रोकडचा धोकादायक स्थितीत प्रवास सुरू होता. ही गंभीर बाब रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर आता रोकडचा हा प्रवास सिक्युरिटी व्हॅनमधून सुरू झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८९ शाखा जिल्हाभरात आहेत. या शाखांना यवतमाळ, पुसद व वणी विभागीय कार्यालयातून रोकडे पुरविली जाते. एक ते दोन कोटी रुपये तर खरीप हंगामात त्या पेक्षा अधिक ही रोकड असते. मात्र आतापर्यंत बेजाबदारपणे व कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय ही रोकड पोहोचविली जात होती. अशा असुरक्षित रितीने रोकड पोहोचविण्यामागे बँकेतील काही संचालकांचा ‘इन्टरेस्ट’ होता. कारण या संचालकांनी निकटवर्तीयाच्या नावे वाहने घेऊन बँकेत भाडेतत्वावर लावली आहेत. हीच वाहने कॅश पोहोचविण्यासाठी गेली कित्येक वर्ष वापरली जायची. या वाहनातून रोकड पाठविणे सुरक्षित नाही, केव्हाही आणि कुठेही धोका होऊ शकतो, याची जाणीव झाल्यानंतरही संचालक व व्यवस्थापनाने केवळ राजकीय स्वार्थापोटी हा धोका पत्करला होता. मात्र रिझर्व्ह बँकेपुढे त्यांची ही मिलीभगत चालली नाही. कोट्यवधीच्या या रकमेचा हा धोकादायक प्रवास रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेला हा प्रवास थांबविण्याबाबत पत्र दिले. मात्र त्यानंतरही संचालकांची इच्छा नव्हतीच. कारण त्यांच्या भाड्याच्या वाहनांना ‘ब्रेक’ लागणार होता. मात्र आरबीआयच्या पत्रापुढे संचालकांचे काहीही चालले नाही. वास्तविक तीन ते चार महिन्यांपूर्वीच कॅश पोहोचविणाऱ्या सिक्युरिटी वाहनांसोबत करार करण्यात आला होता. संचालकांच्या दबावात गेली काही महिने त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. आता गेल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. सिक्युरिटी वाहनांमधून कॅश पाठविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या कोटीच्या रकमेचा धोकादायक प्रवास थांबला
By admin | Updated: July 15, 2015 02:59 IST