उमरखेड : पुसद तालुक्यातील इसापूर येथे असलेला ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प उमरखेड तालुक्यासाठी अभिशाप ठरत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई आणि पावसाळ््यात कृत्रिम पूर असा सामना करावा लागतो. आता या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी शेवटपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरीही हतबल झाला आहे. डाव्या कालव्याचे काम अद्यापही रखडलेले आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा उजवा कालवा मराठवाड्यात आणि डावा कालवा उमरखेड तालुक्यातून जातो. ८५ किलोमीटरचा हा कालवा असला तरी पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. या कालव्याचे विभागीय कार्यालय उमरखेड येथे होते. कर्मचार्ऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली होती. मात्र २०१०-११ मध्ये येथील एका खासदाराने सदर कार्यालय मराठवाड्यात स्थलांतरित केले. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उमरखेड येथे उभारण्यात आलेल्या इमारती ओस पडल्या आहेत. कार्यालय मराठवाड्यात स्थलांतरित झाल्याने येथील समस्या सुटल्या नाहीत. तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष वाढत गेला. तालुक्याती सिंचनाच्या या अपूर्णतेसाठी शासनाचा पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात साखर कारखाना आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने उसाचे अपेक्षित उत्पादन घेता येत नाही. अनेक प्रयोगशिल शेतकरी विविध पीक घेत आहे. परंतु समन्वयाअभिावी शेतकऱ्यांना लाभच होत नाही. तब्बल ८५ टक्के लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा होत आहे. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना लाभच होत नाही. उमरखेड परिसरातील शेत जमिनीची सिंचन क्षमता १९ हजार हेक्टर आहे. या प्रकल्पासह नदी-नाल्यांवरुन केवळ ६०० हेक्टर सिंचन होत आहे. (शहर प्रतिनिधी)
इसापूर धरण ठरतेयं उमरखेडसाठी अभिशाप
By admin | Updated: December 9, 2015 03:05 IST