सोनखास : गेल्या महिनाभरापाूसन पावसाने दडी मारल्यामुळे नेर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने तालुक्यातील ७० टक्केहून अधिक पेरण्या आटोपल्या. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या पेरण्या वाया गेल्या आहे. येत्या तीन-चार दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर आधीच कर्जाचे ओझे असताना आता दुबार पेरणीसाठी पैसा कसा उभा करावा, या काळजीने त्यांना ग्रासले आहे. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटापट पेरण्या आटोपल्या व त्या साधल्यादेखील. यावर्षी पेरण्या साधल्या नाही. चांगले पीक घरी येईल या आशेत शेतकरी असताना गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. ऊनही चांगले तापत आहे. प्रचंड उकाडा वातारणात जाणवत आहे. अशा वातावरणामुळे पीक करपताना दिसत आहे. वाळलेली पिके पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी उभे राहात आहे. होते नव्हते ते सर्व खर्च झाले, पुन्हा एकदा कर्ज काढून मोठ्या आशेने यावर्षी खरिपाचा हंगामात लागवड केली होती, परंतु पुन्हा परिस्थिती तीच आहे. सलग तिसरे वर्ष दुष्काळाच्या छायेत शेतकरी आहेत. आधीच कर्जाच्या बोझ्याखाली दबलेला शेतकरी पूर्णत: खचला आहे. खचलेल्या शेतकऱ्याला शासनाने मदत करणे गरजेचे आहे. आता निसर्गानेच डोळे पांढरे केल्यामुळे कोणाकडे पाहावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडणे सहाजीक आहे. सध्या शेतकरी केवळ वरुणराजाला साकडे घालताना दिसत आहे. (वार्ताहर)
पावसाच्या उघाडीने खरिपाचा हंगाम बुडाला नजरा आकाशाकडे : पिके होत आहे नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 02:32 IST