के. एस. वर्मा लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : भाववाढीच्या आशेमुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. विविध आर्थिक गरजांमुळे काही शेतकरी आपला कापूस विक्रीकरिता आणत आहे. राळेगाव मुख्य बाजार, वाढोणा बाजार व खैरी या उपबाजारात दरवर्षीच्या तुलनेत कापसाची आवक जानेवारी महिना सुरू झाला असला तरी कमीच आहे.
दुष्काळी स्थितीत अल्प उत्पादनाचासुद्धा हा परिणाम आहे. खुल्या बाजारात खासगीत कापूस खरेदीचे दर ७००० ते ७२०० रुपयांच्या आसपास दिला जात आहे. या दिवसात अपवाद वगळता आता बहुतांश शेतकऱ्यांचा कापसाच्या मोजणीत ओलावा आठ टक्के येत असल्याने अशा कापसाला सीसीआयकडून ७४२१ रुपये दर दिला जात आहे.
खासगी व सीसीआयच्या दरात २०० ते २५० रुपये प्रतिक्विंटल इतका मोठा फरक पडत असतानाही अनेक शेतकरी सीसीआयला टाळून खासगीत आपला कापूस विकत आहे. एका वाहनात सरासरी ३० क्विंटल कापूस आणला जातो. यात शेतकऱ्यांना सहा ते सात हजार पाचशे रुपयेपर्यंतचा फटका बसत आहे. तरी अनेक शेतकरी सीसीआयऐवजी खासगीत कापूस विकतात. शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणविल्या जाणाऱ्या नेत्यांनी, संस्थांनी व संघटनांनी याचे कारण शोधण्याची गरज आहे. सीसीआयकडे नोंदणीसाठी कागदपत्रे लागतात. आठ दिवसांत चुकारे मिळतात.
पाच लाख क्विंटल खरेदी खासगीत तीन लाख चाळीस हजार क्विंटल तर, सीसीआयची एक लाख साठ हजार क्विंटल याप्रमाणे आतापर्यंत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी राळेगाव तालुक्यातील तीन केंद्रावर झालेली आहे. खासगीत दररोज सहा हजार तर, सीसीआयकडून दररोज अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे.
शेतकऱ्यांना रोख हवी शेतकऱ्यांना कापूस विकल्याबरोबरच नगदी पैसे हवे असतात. त्याकरता वेळप्रसंगी एक, दीड, दोन टक्के पैसे कपात करून देण्यासही ते तयार होतात. कापूस विक्रीतील पैसे घरी आणून दुसऱ्या दिवशी ते बँकेत भरतात. यात मोठ्या रकमेची ने-आण करण्याची जोखीमही त्यांच्याकडून घेतली जाते.