यवतमाळ : सहकारातील निवडणुकांच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभेची मोर्चेबांधणी केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या बोरी सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीतून ही बाब स्पष्टपणे पुढे आली आहे. काँग्रेसने आतापासूनच चालविलेली ही मोर्चेबांधणी शिवसेनेसाठी हूरहूर वाढविणारी ठरू शकते. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या बोरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक नुकतीच पार पडली. सूत गिरणीच्या निकालाने मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपा या तीनही प्रमुख पक्षांना चांगलाच धक्का बसला. हे तीन पक्ष एकत्र असूनही त्यांना वर्चस्व निर्माण करता आलेले नाही. उलट या निवडणुकीने भाजपा व राष्ट्रवादीसोबतच शिवसेनेलाही त्यांची जागा दाखवून दिली. निवडणूक टाळण्यासाठी काँग्रेसने स्व:ताहून मैत्रीचा हात पुढे केला पण शिवसेनेने तो झिडकारला. पर्यायाने गतवेळी आयत्या नऊ जागा पदरात पाडून घेणारी शिवसेना यावेळी चांगलीच तोंडघशी पडली. काँग्रेसच्या विरोधात एकत्र आलेले भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी हे तीनही पक्ष केवळ बोरी सूत गिरणीपुरता विचार करीत असताना काँग्रेसने त्या पुढे जाऊन विचार केला. सहकारातील या सूत गिरणीच्या निवडणुकीच्या आडोश्याने काँग्रेसने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली. वाशिम, कारंजापासूनच्या नेत्यांना बोरी सूत गिरणीसाठी एकत्र आणले. या एकजुटीमुळेच काँग्रेसला बोरी सूत गिरणीत सर्वाधिक १६ जागा एकहाती मिळविता आल्या. सहकारातून लोकसभा मतदारसंघ बांधणीचा हा फंडा यशस्वी झाल्याने काँग्रेसने आता या लोकसभा मतदारसंघात आगामी काळात होणाऱ्या बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या या सारख्या सहकारातील सर्वच निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखली आहे. सूत गिरणीच्या या निकालाने मात्र शिवसेनेला लोकसभा किंवा विधानसभेत परास्त करणे कठीण नाही, असा पॉझिटीव्ह संकेत दिल्याचे मानले जात आहे. काँग्रेसने छुटपुट निवडणुकांच्या माध्यमातून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुरू केलेली मोर्चेबांधणी शिवसेनेसाठी ‘सक्रिय व्हा’ असा संदेश देणारी ठरली आहे. वाशिम-कारंजातील आघाडीच्या नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या हातात दिलेला ‘हात’ शिवसेनेसाठी चिंता वाढविणारा ठरू शकतो. बोरी सूत गिरणीसाठी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. परंतु सहकारातील मतदारांनी-शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेसच्या नेतृत्वातील पॅनलला आपली पसंती दर्शविली. यावरून मतदारांच्या डोक्यात ‘चेंज’चा विचार घुमतोय, असा तर्क राजकीय गोटात लावला जात आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मुळातच काँग्रेसची ताकद आहे. मोदी लाटेमध्येसुद्धा या मतदारसंघाने नवख्या अॅड. शिवाजीराव मोघे यांना अवघ्या १५ दिवसांच्या तयारीत तब्बल चार लाख १५ हजार मते मिळवून दिली होती. मोदी लाट नसती तर कदाचित हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला असता. भावना गवळींना मोदी लाटेनेच त्यावेळी तारले, हे सर्वश्रृत आहे. सुमारे सव्वाचार लाख मते देणाऱ्या या मतदारसंघाकडे मोघेंनी मात्र लोकसभेच्या निकालानंतर पाठ फिरविली. त्यांचा पुन्हा संपर्कच झाला नसल्याचा नागरिकांचा सूर आहे. मोघे संपर्कात नसल्याचे पाहूनच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात अचानक सक्रिय झाले आहे. मोघे मात्र ‘परिषदे’च्या छुप्या तयारीतच व्यस्त आहेत. शिवसेनेच्या गोटातही सामसूम कायम आहे. काँग्रेस सक्रिय झाल्याचे संकेत अद्यापही त्यांना कळले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. (जिल्हा प्रतिनिधी) महसूलच्या ‘परफॉर्मन्स’चा परिणाम सहकारातील निवडणुकीवर४सहकारातील या निवडणुकीच्या आडोश्याने काँग्रेसने दिग्रस विधानसभा मतदारसंघातही चाचपणी केली आहे. त्यात भाजपा आणि राष्ट्रवादीच नव्हे तर शिवसेनेलाही डावलून काँग्रेसच्या पारड्यात १६ जागा टाकल्याने या मतदारसंघातील नागरिक शिवसेनेच्या ‘परफॉर्मन्स’वर नाराज असल्याचे दिसून येते. दुष्काळग्रस्त गावांना मदत वाटपात शिवसेनेच्या महसूल मंत्रालयाचा ‘परफॉर्मन्स’ उघडा पडला. त्याचा परिणाम सूत गिरणीच्या निवडणुकीत दिसून आल्याचे मानले जाते.
सहकारातून लोकसभा मतदारसंघाची बांधणी
By admin | Updated: April 5, 2016 04:54 IST