नागरिकांची उसळली गर्दी : जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याने अधिकाऱ्यांची उडाली प्रचंड तारांबळपांढरकवडा : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग गुरूवारी शहरात आल्याने दिवसभर कर्मचारी, अधिकारी, नागरिक तसेच तालुक्यातील जनतेत कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरचीच चर्चा होती. प्रत्येक जण कलेक्टर आले का, कोठे गेले, काय केले, हीच चर्चा एकमेकांसोबत करीत असल्याचे चित्र दिसून आले. काही कर्मचारी त्यांच्या लोकेशनबाबत फोनवर माहिती मिळवत असतानाही दिसत होते. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ दिसून आली. नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या गर्दीने एक वेगळा विक्रम निर्माण केला. जिल्हाधिकारयांनी दिवसभर गावांना भेटी देणे, आढावा सभा, नागरिकांच्या समस्या या सर्व बाबींना वेळ दिल्याने प्रशासन कसे असते, याचा एक नमुनाच सादर झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यातील मांगुर्डा या गावी भेट दिली. त्यांनी गावाची पाहणी केली. त्यानंतर तेथे जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यानंतर ते पांढरकवडा शहरात दाखल झाले. येथील शहीद नागेश्वर जिड्डेवार रंगमंचमध्ये त्यांच्यासह डॉ.कलशेट्टी यांनी पांढरकवडा, घाटंजी, झरीजामणी तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महसूल, कृषी विभाग, पोलीस, नगरपरिषद आदी सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांना जनतेची कामे तातडीने करा, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा हे नाव उच्चाटन करण्यासाठी कामे करण्याचे, गावकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा व जनतेची सेवा करा, असे निर्देश दिले. तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत कामामध्ये हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. यानंतर डॉ.कलशेट्टी यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात नागरिकांच्या समस्या व निवेदन घेण्यासाठी वेळ दिली. तेथे आपल्या समस्या व निवेदन देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. समस्या सांगण्यासाठी व निवेदन देण्यासाठी झालेल्या गर्दीने प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास दिसून येत होता. त्यांनी सर्वांचे म्हणणे शांततेने ऐकून घेतले. गुरूवारी दिवसभर त्यांच्या धडाक्याने प्रशासनाची ‘स्पीड’ प्रथमच तालुक्यातील नागरिकांना दिसून आली. (शहर प्रतिनिधी)ग्रामस्थ समाधानीतालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पांढरकवडा येथे दाखल झाले होते. या सर्व ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन विविध समस्या कथन केल्या. अनेकांनी समस्यांचे निवेदनही त्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची ग्वाही यावेळी त्यांना दिली.
दिवसभर कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरच...
By admin | Updated: July 17, 2015 02:27 IST