पुरस्कार नाकारले : शंकरबाबा झाले प्रेरणास्थान यवतमाळ : अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर अपंग, निराधारांच्या जीवनात आशेचा अंकुर फुलवित असून त्यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे. सर्व निराधारांना आधारकार्ड, रहिवासी दाखले आणि मतदानाचा अधिकार मिळवून दिला. अशा या बाबांची सातवी कन्या लाजवंती हिचा साक्षगंध दिग्रस येथील श्रीराम वसंत सरमुकद्दम या तरुणाशी रविवारी होत आहे. बुलडाणा अर्बन बँकेच्या सेवत असणारा श्रीराम एका अनाथ मूकबधीर मुलीशी विवाह करून परिवर्तनाची नांदी देत आहे. आचार्य रजनीश एक वादग्रस्त आणि गुढ असे व्यक्तिमत्त्व. अनेकांच्या प्रखर टीकेचा विषय. योगसाधनेपेक्षा मानवाची सेवा महत्वाची हा त्यांचा संदेश शंकरबाबा पापळकरांसाठी जीवनदायी ठरला आणि बाबांचे आयुष्यच बदलून गेले. १९९० साली अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे अंबादासपंत वैद्य विकलांग बेवारस बालगृहाची स्थापना करण्यात आली. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या सहकार्याने हे पुनर्वसन केंद्र सुरू असून आज या संस्थेत ९८ मुली आणि २५ मुले आहेत. या सर्वांचे संगोपन करून त्यांच्या पुनर्वसनासाठी धडपड केली जाते.शंकरबाबा म्हणाले, देशात सात कोटी अपंगांची मतदार नोंदणी झाली नाही. विकलांगांचे पुनर्वसन करणारी भारतातील एकमेव संस्था म्हणून भारत सरकारने वझ्झर मॉडेलला मान्यता दिली आहे. आता जोपर्यंत देशातील १८ वर्षावरील बेवारस आणि अपंगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा होत नाही तोपर्यंत मी कोणताही पुरस्कार स्वीकारनार नाही. विशेष म्हणजे बाबांनी पद्मश्री, दिनानाथ मंगेशकर आणि फाय फाऊंडेशनचा पुरस्कार नाकारला आहे. अनाथ अपंगांच्या पुनर्वसनासाठी धडपडणाऱ्या बाबांनी संस्थेच्या २५ एकर जागेत अपंगांच्या मदतीने वनराई विकसित केली असून आता फळ झाडापासून उत्पन्नही मिळत आहे. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
निराधार, अपंगांच्या पुनर्वसनासाठी धडपड
By admin | Updated: June 29, 2015 00:05 IST