१६ भरारी पथके : टोल फ्री क्रमांकावर नोंदविली जाणार तक्रार
यवतमाळ : खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. सर्वाधिक क्षेत्र सोयाबिनखाली असण्याचा अंदाज आहे. असे असले तरी जिल्ह्याला लागणार्या बियाण्यांपैकी ३० टक्के बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे. या स्थितीत बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भरारी पथकांवर मोठी जबाबदारी असणार आहे. बाजारपेठत आलेले बियाणे भेसळयुक्त निकृष्टदर्जाचे तर नाही ना, याची चाचपणी त्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रांतील बियाण्यांचे नमुने घेण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहे. पेरणीपूर्वीच या नमुन्यांचा अहवाल मिळणार आहे. परंतु या कालावधित बोगस बियाणे शेतकर्यांच्या घरांपर्यंत पोहचण्याचीही दाट शक्यता आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोळा तालुक्यांतील भरारी पथकांना सतर्क राहावे लागेल. त्या अनुषंगाने ४८ कर्मचार्यांची नियुक्ती या पथकांमध्ये करण्यात आली आहे. पथकप्रमुखांचा क्रमांकही शेतकर्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. तसेच इतर कुणालाही बोगस बियाण्यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास ती या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या कालावधित तक्रार नोंदवायची असल्यास १८०० २३३ ४००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केले आहे. (शहर वार्ताहर)