बाभूळगाव : भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथील बसस्थानकावर गुरुवारी सुमारे एक तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. बाभूळगाव तालुक्यातील सावर, पहूर व मादणी येथील नागरिकांना वीज समस्येचा मोठा सामना करावा लागतो. वारंवार विनंती करूनही उपयोग झाला नाही. पाण्याअभावी पिके करपत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने मोटारपंप जळत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी बाभूळगाव येथे आले. यवतमाळ-धामणगाव मार्गावर बसस्थानकासमोर ठिय्या मांडला. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली. पोलीस उपनिरीक्षक सचिन शेलोकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता एस.व्ही. झाडे यांना पाचारण केले. त्यानंतर येत्या दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रमोद डफळे, डॉ. शुद्दलवार, सुरेश राठी, भानुदास टोणे, रवींद्र गुल्हाने, नरेंद्र बोबडे, संतोष ठावरी यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
बाभूळगाव येथे चक्काजाम
By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST