जि.प., पं.स. निवडणूक : १७ व १८ जानेवारीला मुलाखती यवतमाळ : मोदी लाट कायम असल्याने भाजपाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची रीघ लागल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीही मोठी गर्दी पहायला मिळत आहे. जिल्हा परिषद व १६ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आतापर्यंत दीड हजारांपेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती काँग्रेस कार्यालयातून ‘लोकमत’ला देण्यात आली. यातील सुमारे ४०० अर्ज जिल्हा परिषदेच्या ६२ जागांसाठी असून उर्वरित अर्ज पंचायत समितीची उमेदवारी मिळविण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले. अर्जांची ही संख्या पाहता काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १७ व १८ जानेवारी अशा दोन दिवस ठेवल्या आहेत. १७ जानेवारीला यवतमाळ, पुसद, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी या तालुक्यातील मुलाखती होतील. तर उर्वरित तालुक्याच्या इच्छुक उमेदवारांना १८ जानेवारी रोजी तपासले जाईल. उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसची २० सदस्यीय निवड मंडळ आहे. त्यात पक्षाचे विद्यमान व माजी मंत्री, आमदार, खासदार यांचा समावेश आहे. पक्षाचे निरीक्षकही त्यात आहे. या मुलाखतीनंतर कोणत्या गटाचा आणि गणाचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण याचा निर्णय घेतला जाणार आहे. नोटाबंदीने भाजपाविरुद्ध रोष जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार, पालकमंत्रीपद, सोबतीला मोदी लाट या बळावर जिल्हा परिषद व पंचायत समित्या काबीज करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. परंतु ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे गेले ५० ते ६० दिवस नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अद्यापही हा त्रास संपलेला नाही. त्यामुळे भाजपा आणि मोदी सरकारच्या विरोधात रोष पहायला मिळतो आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, ग्रामीण जनतेची नाडी ओळखून इच्छुकांनी आता भाजपाऐवजी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी गर्दी केल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीला प्राप्त अर्जांच्या संख्येवरून दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी) ४जिल्ह्यात ज्येष्ठनेते तथा माजी मंत्री, आमदार मनोहरराव नाईक यांच्यामुळे केवळ पुसद विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व असले तरी यावेळी या विभागातील आठ पैकी चार जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान राहणार आहे. कारण श्रीरामपूर व काकडदाती या सर्कलमध्ये शिवसेनेचे तर जांबबाजार व शेंबाळपिंपरी येथे भाजपाचे वर्चस्व वाढले आहे. त्यामुळे या चार जागांवर राष्ट्रवादी विरोधात भाजपा-सेनेची काट्याची टक्कर होण्याचे संकेत आहे. नुकत्याच झालेल्या पुसद नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने सर्वाधिक १४ जागा मिळविल्या आहे. त्यात भाजपाच्या तब्बल दहा जागा आहेत. राष्ट्रवादीला १२ तर काँग्रेसला केवळ तीन जागा मिळविता आल्या. हा निकाल पाहता पुसद विभागातील ग्रामीण भागातही राष्ट्रवादीला निवडणूक तेवढी सोपी नसल्याचे स्पष्ट होते. ४ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्याने शिवसेनेने जणू ‘भाजपा शत्रू नंबर वन’ असे संकेत देत या पक्षाला निवडणुकीत आडवे करण्याची गर्जना केली. ते पाहता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती होण्याची शक्यता कमीच आहे. तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पुसद वगळता इतरत्र अस्तित्वच नसल्याचे सांगत काँग्रेसनेही या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे.
काँग्रेस उमेदवारीसाठी दीड हजारांवर इच्छुकांचे अर्ज
By admin | Updated: January 14, 2017 01:49 IST