सवना : शेतातून गेलेल्या वीज तारांच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीमुळे तीन एकरातील उभा ऊस जळून खाक झाल्याची घटना महागाव तालुक्यातील सवना येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी शेतकऱ्याने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.सवना येथील शेतकरी गणेश नामदेव पतंगे यांच्या शेतात ऊस उभा आहे. याच शेतातून ३३ केव्ही वीज वाहिनीचे तार गेले आहे. गत दोन-तीन महिन्यांपासून तारांमध्ये घर्षण होवून विजेचे गोळे पडत आहे. या प्रकाराची माहिती १५ दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला दिली. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, गुरूवारी दुपारच्यावेळी विजेचा गोळा पडून या शेतातील सुमारे तीन एकर क्षेत्रातील ऊस जळून गेला. हा ऊस आता गाळपाला जाऊ शकणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि वीज वितरण कंपनीकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)
सवना येथे तीन एकरातील ऊस जळाला
By admin | Updated: October 24, 2015 02:28 IST