२२५ दुकाने भुईसपाट : पोलिसांचा तगडा बंदोबस्त यवतमाळ : यवतमाळ शहराच्या चौफेर वाढलेल्या अतिक्रमणावर अखेर शनिवारी प्रशासनाचा बुलडोजर चालला. पहिल्या दिवशी आर्णी मार्गावरील २२५ अतिक्रमण भूईसपाट करण्यात आले. तगड्या पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेला अतिक्रमणधारकांनी सुरुवातीला विरोध केला. प्रशासनाचा फौजफाटा पाहून नंतर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. यवतमाळ नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, दूरसंचार विभाग आणि पोलीस खात्याच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम शहरात राबविण्यात आली. सकाळी ९ वाजता अतिक्रमण हटाव पथक आर्णी मार्गावर पोहोचले. वडगाव स्थित वडारवाडीपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर अंतरापर्यंतचे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. यामध्ये व्यावसायिक प्रतिष्ठानांवर प्राधान्याने कारवाई करण्यात आली. दोन बुलडोजरच्या मदतीने १२ मीटरच्या आत येणारे सर्व अतिक्रमण भूईसपाट करणे सुरू झाले. रस्त्याला लागून असलेले वसाहतीचे फलक आणि अनेक दुकानांचे छतही या मोहिमेत धारातिरथी पडले. अतिक्रमण हटाव पथक आर्णी मार्गावर पोहोचताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. सुरुवातीला या मोहिमेला काही दुकानदारांनी विरोध करून पाहिले. आम्ही आताच दुकाने हटवितो असे म्हणू लागले. मात्र महिनाभरापासून नोटीस देऊनही अतिक्रमण का हटविले नाही, असा सवाल करीत दुकानांवर बुलडोजरचा पंजा चालला. प्रशासनाची कडक भूमिका बघता त्यानंतर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढणे सुरू केले. बुलडोजर पोहोचण्यापूर्वी अनेक जण आपली दुकाने काढताना दिसत होते. काहींनी सायकल रिक्षावरून दुकाने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. आर्णी मार्गावर सकाळपासून पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी पहिल्या दिवशी २२५ दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. जप्त केलेले साहित्य नगरपरिषदेच्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून नेण्यात आले. मात्र अनेकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढल्याने नगरपरिषदेला साहित्य जप्त करण्याची वेळच आली नाही. सायंकाळी ४ वाजता आर्णी नाका परिसरात येऊन अतिक्रमण हटाव मोहीम थांबली. (शहर वार्ताहर)
बुलडोझर चालला
By admin | Updated: January 3, 2015 23:08 IST