जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : दोन दिवसात १३५० दुकानांची तपासणीयवतमाळ : शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांची आता खैर नाही. शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्याचा प्रकार झाल्यास विक्रेत्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिले. ज्यादा दरात बियाण्यांची विक्री केल्यास ५० हजार रुपये दंड ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कृषी निविष्टा पुरवठादार, विक्रेते आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची संयुक्त बैठक बुधवारी घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यवतमाळ जिल्ह्यात १३५७ बियाणे विक्रेते, १५३८ रासायनिक खत विक्रेत, १२२९ कीटकनाशक विक्रेते आहेत. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांचा आदर ठेवावा, बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारू नये, असे बियाणे दुकानातही ठेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. जिल्हा दंडाधिकारी या नात्याने आम्हाला कारवाईचे विशेष अधिकार आहे. या उपरही बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या गेल्यास अशा विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसेच दुकानाला सील ठोण्याचा इशाराही देण्यात आला. निर्धारित दरापेक्षा अधिक दराने बियाण्यांची विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. यामध्ये ५० हजारापर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत कृषी साहित्य विक्रेत्यांच्या अडीअडचणी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. बैठकीला कृषी अधीक्षक दत्तात्रेय गायकवाड, कृषी विकास अधिकारी जगन राठोड, तालुका कृषी अधिकारी आणि विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
खबरदार...! बोगस बियाणे विकाल तर थेट फौजदारी
By admin | Updated: June 4, 2015 02:10 IST