यवतमाळ : जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ३४ कोटींचा विमा मंजूर झाला. यावर्षी पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. अडचणीच्या काळात तातडीने आर्थिक मदत व्हावी म्हणून प्रशासनाकडून पीक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीसह बँकेच्या शाखेमध्ये रक्कम वितरित करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अनेक बँक शाखांनी शेतकऱ्यांना ही रक्कम अजूनही दिलेली नाही. आर्थिक अडचणीत विम्याला लाभ मिळूनही शेतकरी मात्र त्यापासून वंचित आहे. पीक विमा काढणाऱ्या बँक शाखांमधूनच त्याच्या मोबदल्याचेही वितरण केले जाते. विशेष करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतच सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. या पीक विम्याच्या मोबदल्याची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होता. त्या त्या बँक शाखेकडे सोपविली जाते. २९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपये विम्याच्या लाभापोटी मिळाले. कृषी विभाग आणि जिल्हास्तरावरील बँकांकडून ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या यादीसह बँकांच्या शाखांमध्ये जमा करण्यात आली. बँक शाखांनी ही रक्कम आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणे बंधनकारक होते. प्रत्यक्षात मात्र बऱ्याच बँक शाखांनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाच केली नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत तर आॅनलाईनच्या अडचणीची सबब सांगितली जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जोडमोहा शाखेत पीक विमा वाटपाबाबत मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. येथील शाखा व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना असभ्य वागणूक दिली जाते. त्यांच्या तक्रारींचीही दखल घेतली जात नाही. जिल्ह्यातील शेतकरी हा सुरुवातीला अतिवृष्टीमुळे बरबाद झाला. आता खरिपात लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णत: नियोजन कोलमडले. अशा आर्थिक अडचणीच्या काळात पीक विम्याच्या मोबदल्यात मिळालेली रक्कम त्याला कामी पडणारी होती. परंतु बँकांच्या मनमानीमुळे अनेक शेतकरी आपल्या हक्काच्या पैशापासूनच वंचित असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळते. या बाबत कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, बँकांना पैसा देण्यात आला आहे. मात्र त्याचे वाटप कितपत झाले, याची कुठलीही माहिती बँकांकडून पुरविण्यात आली नाही. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. या बाबत जिल्हा पातळीवरच्या बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात येईल. बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करावी, असेही निर्देश दिले जाईल. (कार्यालय प्रतिनिधी)
बँकांनी पीक विम्याचा मोबदला दिलाच नाही
By admin | Updated: September 8, 2014 01:51 IST