विलास गावंडे यवतमाळनवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्यांचा कालावधी लोटला. यानंतरही जिल्ह्याच्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हाती अनेक विषयांची पुस्तके पडली नाही. सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव जुन्या आणि अभ्यासक्रमाच्या अर्धवट पुस्तकावर विद्यार्जन करावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या सापत्नभावामुळे निर्माण झालेली पुस्तकाची कोंडी आणखी किती दिवस फुटणार नाही, हा प्रश्न पालकांपुढे उभा ठाकला आहे.वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. वास्तविक शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडावी, हा नियम आहे. जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांच्या बाबतीत तसे घडते. परंतु खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कित्येक दिवसपर्यंत नवीन पुस्तकांची वाट पाहावी लागते. जिल्ह्यातील ३५० अनुदानित माध्यमिक आणि ७५ प्राथमिक अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही पूर्ण पुस्तके मिळालेली नाही. काही शाळांपर्यंत तर एकही पुस्तक पोहोचले नाही. पहिली आणि दुसरीचे सेमी इंग्रजीचे एकही पुस्तक विद्यार्थ्यांना पाहायलाही मिळाले नाही. तिसऱ्या वर्गाचे मराठीचे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती पडले नाही. चौथ्या वर्गाचे सेमी इंग्रजी गणित विषयाचे पुस्तक शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. वर्ग पाच ते सातच्या हिंदी विषयाच्या पुस्तकाने तर खासगी शाळांकडे जणू पाठच फिरविली आहे. शिवाय इंग्रजी विषयाची पुस्तकेही पूर्ण उपलब्ध झालेली नाही. आठव्या वर्गाचे गणित आणि सेमी सायन्सचे पुस्तकं पोहोचले नाही. चालू सत्रापासून पाचव्या वर्गाचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यामुळे जुनी पुस्तकेही शिक्षणासाठी वापरता येत नाही. पुस्तके केव्हा उपलब्ध होणार, या विषयी अनिश्चितता आहे. शासनाकडून मोफत पुस्तके दिली जात असल्याने बाजारातही ही पुस्तके मिळत नाही. अशा स्थितीत अभ्यासक्रम महिनाभर मागे पडला आहे.
५० हजार विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकांचा वांदा
By admin | Updated: August 2, 2015 02:21 IST