यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी ते करणार आहेत. राजेंद्रसिंह ११, १२ व १३ सप्टेंबर असे तीन दिवस यवतमाळात चौकशी कामी स्वत: उपस्थित राहणार आहे. त्यांच्या नेतृत्वात चौकशी केली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच चौकशीचे हे कामकाज होणार आहे. या चौकशीच्या अनुषंगाने याचिकाकर्ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, घाटंजी तालुक्यातील अन्य चार जण व प्रकरणाशी संंबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांनाच साक्ष देण्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे. सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण सन २००३ पासून गाजत आहे. या प्रकरणात शैलेश ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्याकडे या मृत्यू प्रकरणाची चौकशी सोपविली. शिवाय तीन महिन्यात हा चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेशही जारी करण्यात आले. विशेष असे याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने चार वर्षांपूर्वी सर्व संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. त्याविरोधात शैलेश ठाकूर यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा कायम ठेवला आहे. येथील धामणगाव रोड स्थित व्यापारी बजाज आणि डॉ. श्रोत्री यांच्याकडे २००३ मध्ये दरोडा पडला होता. या प्रकरणात संशयावरून येथील सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात असतानाच या दोघांचा मृत्यू झाला. (स्थानिक प्रतिनिधी)
औरंगाबाद पोलीस आयुक्तांंचा तीन दिवस यवतमाळात मुक्काम
By admin | Updated: September 10, 2014 23:59 IST