यवतमाळ : चमेडियानगरातील राजकुमार प्रजापती याच्यावर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून केलेल्या प्राणघातक हल्ल्यामागे त्याने अक्षय राठोडची टीप पोलिसांना दिल्याचा संशय हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. विशेष असे राजकुमार व अक्षय हे दोघे एकेकाळी जीवलग मित्र होते. मात्र आज ते गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या लढाईतून एकमेकांच्या जीवावर उठले आहे. राजकुमार प्रजापती याचा कालू उर्फ स्वप्नील तलमले रा. चमेडियानगर याच्याशी वाद झाला होता. जानेवारी महिन्यात प्रजापती याने सहकाऱ्यासह स्वप्नीलवर जीवघेणा हल्ला केला. एकत्रच गुन्हेगारी क्षेत्रात दहशत पसरवू पाहणाऱ्या या मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद वाढत गेला. हे सर्व अक्षय राठोड या कुख्यात गुन्हेगाराच्या संपर्कात होते. दरम्यान राजकुमार प्रजापती या टोळीतून बाहेर पडला. महिन्याभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने अक्षय राठोडला नेर येथून अटक केली होती. अक्षयची माहिती पोलिसांना राजकुमारनेच पुरविली असावी, या संशयातून राजकुमारवर हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनिकेत गावंडे, आशिष दांडेकर, शुभम बघेल यांच्यासह अन्य तीन आरोपींनी बंदुकीतून गोळीबार केला. जुने वैमनस्य टोकाला पोहोचले असून यावरून आणखी भडका उडण्याची चिन्हे आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
राजकुमारवरील गोळीबारामागे अक्षय राठोडची टीप दिल्याचा संशय
By admin | Updated: June 24, 2016 02:36 IST